इरशाळगड-शिवाजी शिडीने माथेरान : उत्तरार्ध

2 comments:
© Sandip Wadaskar

इरशाळगडाच्या सुळक्याच्या दर्शनाने कृत्याकृत्य झाल्यासारखे वाटत होते. इरशाळवाडीतून ठाकुरवाडीकडे चालायला सुरुवात केली. पुढल्या वेळेला आलो तर,वाडीतल्या शाळेत मुक्काम करण्याचा बेत मनात पक्का केला. पठारावर आलो तेव्हा पावसाचा जोर कमी झाला होता. समोर गाई चरण्यास सोडुन एक म्हातारे आजोबा उभे होते अन बाजूला एक चिमुकली हुंदडत होती . "बाबा,ठाकुरवाडीची वाट कुठुन आहे ?" मी विचारलं. "वाट न्हाय !",बाबा उत्तरले. "वाट नाही !" "म्हणजे वाट हाय,पण तुमास्नी समजणार न्हाय. ढोरवाटा बी लयी हाय ." ,इति बाबा. बहुतेक बाबाला आम्ही पोरं वाट चुकण्याची भीती वाटत असावी. विश्वासात घेत आम्ही त्यांच्याकडून वाट निश्चिती करून घेतली आणि वाट शोध मोहिमेसाठी निघालो. बाबांच्या म्हणण्यानुसार एक ओढ वजा नदी लागेल आणि ओढा पार केला की लगेच ठाकूरवाडी. आमची भटकंती सुरु झाली. पठारावरून झाडीत शिरलो. पाऊस अधेमध्ये आपलं अस्तित्व जाणवत होता. पायवाट जरी मळलेली असली तरी, अधून मधुन ढोरवाटा पण भेटीला येत होत्या. त्यातल्या त्यात पायवाट शोधावी लागत होती. पावसातल्या भटकंतीचा सगळ्यात मोठी गंमत म्हणजे धोपट वाटा या सर्व हिरव्या गालीच्या खाली झाकल्या जातात आणि त्या शोधण्यात मोठी मज्जा असते. आता हीच मजा अनुभवायला इथे आलेलो!                      

© Sandip Wadaskar

चारही बाजूनी हिरवीगार गर्द झाडी. गेली चार पाच महिने उन्हाचे चटके सोशीत काढलेल्या पर्वतराजीने हिरवीगार शाल पांघरल्यासारखे भासत होते. जणु नव्या नवरीने आपल्या माहेरपणाला आल्यासारखे. पण हे माहेरपण अजुन दोन-तीन महिने चालणार होते. या कल्पनेने थोडे हसु आले आणि कारण काय तर "दोन-तीन महिने नवरा मोकाट सुटणार होता." असो! अशा या शाल पांघरलेल्या परिसरातून चिखलाची रानवाट तुडवत आम्ही चार भटके चालत होतो,निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत! फक्त निसर्ग आणि आम्ही. अधुन मधून गावकरी भेटत होते. निर्भेळ सुख आणि एकांत! मोरबे धरणाची माथेरान कडील बाजु निमुळती झालेली दिसली. थोड्याच वेळात इरशाळवाडीचा डोंगर उतरून झाला,बैलगाडीचा रस्ता सुरु झाला. आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्हाला शोधायचा होता ओढा! जास्त विचार न करता पुढे चालत गेल्या गेल्याच ओढ्याने आमची वाट अडवली. थोडाफार आलेला थकवा पार कुठल्या कुठे पळाला. आता फक्त स्वच्छ नितळ पाण्यानी अंघोळ करायची बास.

चहुबाजूनी डोंगरांच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात. डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या पाण्याने तयार झालेला नितळ ओढा. थोडं झाडीत शिरल्यावर दगडांच्या बांधावरून धोधो वाहणारे दुधासारखे तेच पाणी. आणि तयार झालेला छोटासा धबधबा. वाह ! क्या बात है ! आणि दुग्धशर्करायोग म्हणजे (दुधात साखर घातल्यासारखे बरं का!) त्या नयनरम्य जागी फक्त आम्हा चार भटक्यांची टोळी. अफलातुन वाह ! वाह ! मला एकदम गर्दीने भरलेल्या लोणावळ्याजवळील कुठलाशा एका धबधब्याची आठवण झाली. 

© Sandip Wadaskar
पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची लोणावळा-खंडाळा या ठिकाणांकडे धाव सुरु होते. अक्षरशः जत्रा भरते. या दिवसांमध्ये राकट,कणखर सह्याद्री जलप्रपातांनी न्हाऊन निघालेला असतो. रौद्र सह्यपर्वताचे हे रूप पालटलेलं असतं. निसर्गाचे हे विलोभनीय सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. अशाच लोणावळा-खंडाळा या थंड हवेच्या ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीने का होईना ? विकास चाललाय. (हा विकास चुकीच्या मार्गांनी चाललाय ,हा वादाचा मुद्दा ??) पण इथे येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. "पर्यावरणाची हानी" हा विषय हास्यावर नेणारे बरेच महाभाग पर्यटक इथे भेटतात. म्हणजे इथे यायचं,उघडे-नागडे होऊन,दारू पिऊन गोंधळ घालायचा,खाण्याची वेस्टने,दारूच्या-पाण्याच्या बाटल्या तिथेच टाकायच्या आणि वरून "आम्ही काहीतरी अचाट केलय" या आविर्भावाने घरी परतायचं. लोकांना कल्पनाच नाहीये की ही परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर होत चाललीये. असो. "लोकांना सुबुद्धी येऊ दे." हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 



धबधब्याखाली निसर्गस्नान आटोपुन फोटोसेशन चा मनमुराद आनंद लुटला. मनोरेच्या सागरने तर ३ bhk apartment असे नामकरण करून प्रत्येकास एक कोपरा वाटुन दिला. या कार्ट्याचं डोकं कुठे आणि कसं चालेल याचा नेम नाही. आणि इंद्रा हे ध्यान ,कुठलं ध्यान करत बसलेले देव जाणे! 

© Sandip Wadaskar

थोडी पोटपूजा आटोपुन ठाकूरवाडीकडे चालायला सुरुवात केली. स्वच्छ पाण्याने अंघोळ झाली होती,पोटात थोडफार गेलं होतं. पुढे चालण्यास एवढी उर्जा पुरेशी होती. अशेच दोन-तीन ओढे पार केल्यानंतर सपाटीला पोहोचलो. झाडी थोडी विरळ झाली. आणि समोर माथेरानच्या डोंगराने दर्शन दिले. माथा पूर्ण धुक्यात हरवलेला. पुढे एका दगडावर एक म्हातारे आजोबा जणू काही आमचीच वाट पाहत थांबले आहेत अशा अविर्भावात बसलेले दिसले. "बाबा,ठाकूरवाडी अजून किती लांब आहे?",इति अतुल. "हीच ठाकूरवाडी! ",इति बाबा. अरे वाह. म्हणजे आपण वाडी पर्यंत पोहोचलो तर. बाबांना केळीचे वेफर्स देऊ केले. त्यांनी ते अगदी प्रसादासारखे स्वीकारले. किती साधी-सरळ असतात नाही ही माणस? पण वाडीतले घरं आम्हाला दिसली नाहीत.बैलगाडी रस्त्याने चालत परत एका वाडीत शिरलो. भात लावणी चाललेली. वाडीचं नाव विचारलं,काय बरं नाव ? … हो पिरकडवाडी. मस्त डोंगरांच्या कुशीत वसलेली सात-आठ घरांची वाडी. भरपूर पाऊस असल्यामुळे भातातीच शेती जास्त. "जा,दादाबरोबर शिडीपर्यंत" कुणीतरी मागुन त्यांचं किरटे पोर हाकलल्यासारखी हाक दिली. मागे वळून पाहिलं तर कुणीच नव्हतं,बहुदा पोरानं बापाचं ऐकलं नसावं. असु दे. अशाच ठाकरांच्या दोन-तीन वाड्या पालथ्या घालून एका मोठ्या ओढ्याने परत आमची वाट अडवली. ओढ्याचा प्रवाह बराच. वातावरण पार निवळून गेलेलं.धुळीचे कण पावसाच्या जोरदार तडाख्याने जमिनीवर स्थिरावले होते. खूप वेळानंतरच्या भरपूर सूर्यप्रकाशाने आसमंत उजळून निघाला होता. पण माथा अजूनही धुक्याच्या कवेत शांत निजला होता. सूर्यप्रकाशाने हजेरी लावल्याने आपसूकच क्यामेरे बाहेर पडले. रस्ता विचारण्यासाठी इंद्रा आणि मी वाडीत शिरलो,परत आलो तर अतल्या आणि सागरचा पत्ता नव्हता. फोटो काढण्याच्या नादात बहुतेक हे दोघे मागेच राहिले असावे. त्यांना हाका मारून मारून हैराण. जाऊ दे. भेटतील इथेच.




 इरशाळ गडाचा उत्तुंग सुळका आमची पाठराखण करत होता. "मी आहे,तुम्ही निघा खुशाल माथ्याकडे " असं काहीतरी खुणावत होता. वाडी सोडून दाट झाडीत शिरलो,इथून आता चढण लागणार होती. डोंगराच्या पोटात परत एका धबधब्याने आमचे स्वागत केले. बाजूलाच कातळावर निवांत जागा दिसली बसायला. विचार केला, थोडंसं तहान लाडु-भूकलाडू पोटात ढकलूनच पुढे जावूयात. पिशव्या खुलल्या. या अतल्याने तीनच केळी -तीनच सफरचंद आणले होते. म्हणे "स्यांडी ,तु येणार नव्हतास ना ? आमच्याबरोबर !" जाऊ दे. आता काय बोलायचं ? पैकी तिन्ही केळी मनोरेच्या कार्ट्यानी अधाशासारखी काल रात्री स्टेशनलाच संपवलेली. पण अख्खं सफरचंद मी एकट्याने बळकावल्यामुळे तिघांमध्ये उरलेल्या दोन साठी भांडण. चालु देत. आपल्याला काय त्याचं ? मी आपला खात बसलो. धबधब्याचे नामकरण झालं ," Apple कॉर्नर". 

© Sandip Wadaskar
 



खुप वेळ झाला. चालत होतो,चढत होतो. मळलेली वाट सापडेना. शिडीची खिंड तर दिसत होती. कुठली तरी ढोरवाट पकडुन पुढे जात होतो अणि अचानक ती पण बंद झाली. आणि नेहमीप्रमाणे वाट चुकण्याची परंपरा राखत मी गँग ला चुकवल. उजव्या बाजुचं टेकाड चढ़ायचं ठरवलं. वर गेल्यावर कुठेतरी वाट दिसेल या आशेनी चढायला सुरुवात केली. त्यात या रानटी डासांनी वैताग आणला होता. जरा कुठे थांबलो की अंगावर मच्छरांचा धुमाकुळ. "पण स्यांडीचा चावा घेताना मच्छरांचेच दात तुटत असतील, नाही ?",इति अतुल. दुसरं कोण ? परत हशा! च्या मारी या अतल्याच्या. चांगली छातीवर येणारी चढण करून आम्ही थोड्याश्या उंचीवर आलो,तेवढ्यात तांबड्या रंगाची चिंचोली वाट दृष्टीस पडली. जीव भांड्यात पडला. वरून दोघे जण येताना दिसले. आयला! एवढी चांगली मळलेली वाट सोडून इकडे कुठे भटकलो? अजून अर्धा तास लागंल,गावकरी. मघापासून पाऊस पण दडी मारून बसला होता. तहान लागली होती. भर पावसाळ्यात घामाने निथळत आणि डासांना शिव्या घालत पहिली शिडी गाठली. येथुन मोरबे धरण, इरशाळगडचा सुळका, धुक्यात हरवलेला प्रबळगडाचा माथा,त्याच्या पोटात असलेले असंख्य धबधबे आणि सभोवताल हिरवीगार किर्र झाडी,दृश्याने थकवाच नाहीसा झाला आणि कुठुन एखाद्या रानपाखराचे मंजुळ गीत ऐकल्यावर तर एकदम ताजेतवाने वाटत होते. 


© Sandip Wadaskar 

पुढे छोटासा ट्रअवर्स पार करून शिडीच्या पायथ्याशी येउन ठाकलो.आधी पाण्याची तहान भागवली. माथ्यावरचे पाणी कातळावरून खाली कोसळत होते. याच कातळामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे खिंडार पडून ही नाळ तयार झाली असेल कदाचित. शिडी ही लाकडी होती. पहिली शिडी लागली ती लोखंडाची होती. लाकडाच्या शिडीवरून वर जायचे म्हणजे मनात थोडी भीतीची लहर उमटलीच. एकतर पाण्यामुळे शिडी कुजुन तुटण्याची शक्यता दाट. घट्ट असल्याची खात्री केली आणि एक एक करुन चढायला सुरुवात केली. शिडी संपेपर्यंत काही नाही वाटलं, मात्र शेवटची पायरी चढताना नाका तोंडात पाणी जात होतं. वारं आणि वरून येणारा पाण्याचा प्रवाह यामुळे थोबाडात मारल्यासारखं पाणी लागत होतं. आणि खरं थ्रिल येथुन सुरु झालं,कारण समोरचं दृष्य पाहिल्यावर तर एकदम हरिश्चंद्रगड-नळीच्या वाटेची आठवण आली. मागे वळून पाहिलं तर direct शिफ्ट-डिलीट. अतुल-इंद्रा पुढ्यात आणि सागर सर्वात शेवटी. पावसाचे पाणी वाहत खाली कोसळत होतं ,नशीब शेवाळ जास्त वाढले नव्हते. या नाळेने चढुन तर जाऊ,मात्र उतरतांना काळजाचे ठोके वाढले नाही तर शप्पथ! माझ्या शूज वरचा विश्वास गेल्यासारखा सागरला पाय धरायला सांगत होतो. या कार्ट्याचा तिथे पण डायलॉग "माझा पाय धरायला ,मी कुणाला सांगु ?". वीस मिनिटात हा भयंकर रॉक पैच पार करून आम्ही माथा गाठला. पाच मिनिटाकरिता सगळ्यांचा इंद्रा(?) झाला होता .हा हा ! 

माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या  कचऱ्याचा ढीग. तेच आपलं अपेक्षित असलेलं वातावरण. शार्लोट लेक जवळ तुफान गर्दी. तिथे अजुन आपली गर्दी न करता सरळ स्टेशन जवळ एका मावशीबायची चहाची टपरी गाठली आणि मिसळ-वडापाव ची फर्माईश देत गप्पा मारत बसलो. उदरमभरणं करून परतीची वाट धरली ती प्रिय सह्याद्रीचा निरोप घेऊन ! इति संपूर्ण अजून एक अविस्मरणीय भटकंती !

धन्यवाद !

कात्रज-सिंहगड Night Trek

5 comments:


© Sandip Wadaskar


कात्रजचा बस थांबा! एक भटका गँग ची वाट पाहत थांबलेला.
तब्बल अडीच तासांनी एक एक करून गँग(सागर,प्रसन्ना,अतुल,इंद्रा,श्रद्धा, अजित,श्रेयस आणि स्वप्नील) हजर.गप्पा-टप्पा मारत कात्रजच्या घाटानी आमचा प्रवास सुरु झाला. आपसूकच मनातल्या मनात इतिहासाची पाने उलटल्या गेली आणि महाराजांच्या शाहिस्तेखानाची बोटे कापून लाल महालातून सुटकेचा प्रसंग डोळ्यासमोर तरळला.
" लाल महालात अचानक हल्ला करून राजांनी शाहिस्तेखानाच्या मुलासह खानाची बोटे कापली आणि गनीम गनीम ओरडत तेथून पळ काढला. नियोजनाप्रमाणे महाराज थोडे पुढे गेल्यावर कात्रज घाटातल्या मावळ्यांना इशारा करण्यात आला आणि आजूबाजूला झाडांवर कंदील टांगल्या गेले. अर्थातच महाराजांनी पर्यायी मार्गाने सिंहगडाकडे कूच केले. पण पाठलाग करणारे खानाचे मुघल सैनिक, कंदिलाप्रकाशाच्या दिशेने घाटाकडे गेले. खूप वेळानंतर मुघलांना त्यांच्या मूर्खपणाची जाणीव होऊन,ते माघारी फिरले. मुघलांनी सिंहगडचा पायथा गाठला. पण तोपर्यंत महाराज त्यांच्या तोफेनिशी गडावर सज्ज होते. मुघल तोफेच्या आवाक्यात येताच,पहिला बार उडाला आणि धांदल उडाली. कित्येक गेले,कित्येक जखमी झाले."
प्रसंग मनात आठवत असतानाच "स्यांड्या कुठेपण मावतो" या अजित च्या कमेंट ने ध्यानावर आलो. मी टमटम च्या विंडो सीट मध्ये बसलो होतो. गँगने टमटम मधुन कात्रज चा जुना बोगदा गाठला. आणि लांबच लांब आणि लांबच लांब …वर खाली वर खाली करत जाणाऱ्या डोंगराकडे कूच केले. मे मधल्या रणरणत्या दिवसभराचे ऊन, त्याउलट रात्रीचे हे आल्हाददायक वातावरण आणि मंद वाऱ्याच्या झुळूक, आमच्या भटक्या मनाला वेड लावून गेले आणि आम्ही आमच्या भिंगरया लागलेल्या पायांना वाट मोकळी करून दिली…सुरु झाली अजून एक अविस्मरणीय भटकंती … सह्याद्रीच्या कुशीत ! 
बोगद्यावर चढुन थोडा चढ गाठला आणि मंदिरातील वाघजाई देवीचे दर्शन झाले. येथुन पुण्याचे क्षितीज भारी दिसत होते. रात्रीचे दहा वाजलेले,एव्हाना जेवणे आटोपुन पुणेकरांची झोपेची तयारी चाललेली असेल,असे मनाला वाटून गेले. कात्रजचा घाट गाड्यांच्या रहदारीमुळे प्रकाशून गेलेला. वाघजाईचे दर्शन घेऊन आम्ही सिंहगडाकडे वाटचाल सुरु केली. आमच्यापैकी याच्याआधी या वाटेला कधी कोण भटकलेलं नव्हतं,त्यामुळे सगळ्यांसाठी रस्ता पूर्णपणे नवखा! म्हणजे रात्रीची वाट शोधण्यात मजा. मध्ये लागलेली बऱ्यापैकी रुंद वाट संपली आणि परत चढ सुरु झाला. सगळ्यांना तो म्हणतात ना ,पहिला दम का काय ते,तो लागला आणि अजित च्या ठरलेल्या कार्यक्रमाचे चिन्हं दिसायला लागले. आणि बघता बघता त्याने तो कार्यक्रम आटोपला. सगळे माथ्यावर पोहोचले. एकमेकांची खेचत आम्ही पुढे होतो. मागुन अजित आला तो,अतुल आणि सागरला शिव्या देतच. बहुतेक सागर ने नको तिथे आणि नको तो फोटो काढला असावा. येथुन वाट अस्पष्ट होती,अजूनही सिंहगडावरचा लाईट दिसला नव्हता. छोटाश्या पायवाटेने चालत पहिला वहिला डोंगर पार केला आणि सिंहगडाचे दर्शन झाले.आतापर्यंत वाऱ्याचा मागमुसही नव्हता,पण माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या सुंसुं करत वाहणाऱ्या थंड वारयानी आमचे स्वागत केले. 

माथ्यावरून सिंहगडपर्यंत दिसणारी मोठीच्या मोठी डोंगरांची लांबच लांब रांग चंद्राच्या थोड्याफार प्रकाशात उजळून निघाली होती. "भटक्या मित्रांसोबत आता या डोंगर रांगेची रात्रभर साथ असणार ",या फक्त कल्पनेनीच सुखावलो. माथ्यावर थोडा वेळ थांबलो, गडावर असणारया दूरदर्शनच्या खांबावरचा लाईट दिशादर्शक समजुन आम्हाला गड गाठायचा होता.माथ्यावरून डावीकडे एक मळलेली वाट दिसली. पुढे मी आणि मागे गँग असे करत, आल्हाददायक वाऱ्याचा आस्वाद घेत आम्ही चालायला सुरुवात केली. पहिला दम लागल्यावर सगळेजण आता ऱ्हिदम मध्ये चालत होते. थोड्याच वेळात माथा उतरलो,तर लक्षात आले की आपण वाट चुकलो.समोर फक्त खोल दरी.पलिकडे जायला रस्ता नव्हता सापडत. एक रस्ता होता,पण तो जर उतरलो असतो तर शिवापूरला पोहोचलो असतो. परत फिरून माथ्यावर आलो. येथून दुसरी कुठली वाट आहे का? शोधायला सुरुवात केली. आणि उजवीकडे एक पायवाट सापडली. नेमकी हीच पायवाट आम्ही चुकलो होतो,हम्म  खरं सांगायचं तर मीच चुकलो होतो.पण खरं सांगु का ? रस्त्यांबद्दल,किंवा कदाचित रस्ते चुकण्याबद्दल माझं एक ठाम धोरण आहे आणि ते मी नेहमी पाळतो. ते म्हणजे "रस्ते हे चुकण्यासाठीच असतात, आणि पहिल्या वेळी ते चुकलेच पाहिजे. त्याशिवाय मजा नाही. " आणि हो रस्त्याबद्दल आमच्याकडे मनोरे साहेबांचं सुद्धा एक मत राखीव आहे, बरं का ! त्यांच्या म्हणण्यानुसार "सगळे रस्ते हे मोक्षाकडेच जातात! काय ?" 

असो. तर आम्ही अचूक पायवाटेने चालायला सुरवात केली. आता ध्येय माहिती होते,रस्ता माहिती होता. पोरं उत्साहानी पाय टाकत,रप रप चालत होते. पहिला डोंगरमाथा उतरून झाला आणि अतुलची कुरकुर सुरु झाली,"कधी जेवायचं ? ". चुल पेटवायला जागा शोधता शोधता अजून एक डोंगर चढुन-उतरून झाला. आता मात्र सगळ्यांना भुका लागल्या होत्या. सरपणाची शोधाशोध झाली. चूल पेटली. सागर आणि अतुलनी मस्त पैकी गरमागरम Maggi तयार केली. अजित आणि श्रद्धाने घरून पराठे आणलेले. सगळ्यावर येथेच्छ ताव मारून मावळे हुशार झाले. १०- १५ मिनिटे आराम करून सिंहगड वारी सुरु केली. 


कात्रज- सिंहगड. हे शीर्षक वाचल्यावर कुठलाशा बस मार्गाची आठवण होणे स्वाभाविक आहे. पण हा बस मार्ग नव्हे, गेली कित्येक वर्षे जातिवंत भटके तुडवत आलेला कोंडाण्याकडे जाणारा हा एक राजमार्गच जणु. मध्ये कुठलेही आकर्षण नसताना पौर्णिमेच्या एखाद्या रात्री अथवा पावसाळ्यात हिरवा गालीचा पांघरलेल्या डझनभर डोंगरातून फक्त पायपीट करण्याची मज्जाच वेगळी आहे. पण गेल्या १०-१२ वर्षात कात्रज घाटातल्या या निसर्ग सौंदर्याला ग्रहण लागले. डोंगरफोडी,मानवी विकृतीचा अतिरेक,पर्यावरणाचा ऱ्हास या सगळ्यांमुळे हे निसर्गलेणं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत राहतील की नाही याचीच भीती वाटायला लागते. 

असो. आमची वारी सुरु होती. अजून २-३ छोट्या मोठ्या डोंगरांचा पल्ला गाठत एका विस्तीर्ण पठारावर येऊन पोहोचलो. गार गार जमिनीला पाठ टेकवली तेवढ्यात उल्का वर्षावाने आम्हाला दर्शन दिले. सागरच्या माहितीनुसार आज मध्यरात्रीनंतर उल्का वर्षा होणार होती, त्यामुळे तीही उत्सुकता या ट्रेक बद्दल होती. शहराच्या गजबजाटात आणि प्रदूषित वातावरणात ही नैसर्गिक देणगी अनुभवणं तर शक्यच नव्हतं. शांत सह्याद्री पहुडलेला.पुणेकर साखरझोपेत.पल्याड शिवापुरकर आणि नसरापूरकर केव्हाच झोपेच्या अधीन झालेले. चंद्र आपल्या मावळतीकडे झुकत चाललेला. चंद्राच्या या निरागस सौंदर्याचं विशेष अप्रूप आणि कौतुक आमच्या अजितलाच जास्त. तो तर एकदम भारावूनच गेला होता. आणि "चंद्रा" चे सागरने काढलेल्या जबरदस्त फोटोंचे श्रद्धा ला कौतुक. पण मला मात्र इथे असणाऱ्या शांततेचं कौतुक ! सकाळचे अडीच-तीन  झाले असावेत. प्रसन्ना घाई करत होता,"चला पटकन,थोडे पुढे जाऊन आराम करूयात". पटापट पोरं उठली आणि चालायला लागली. परत एक डोंगर चढून माथ्यावर आलो. कोणाच्याच तोंडातुन शब्द निघेना, सगळीकडे निरव शांतता. आता मात्र जमीनीला पाठ टेकवण्याची नितांत गरज भासत होती. सपाट आणि मोकळी जागा शोधून, दिली सगळ्यांनी ताणुन.

पहाटेची वेळ. पाच-सव्वापाच झाले असतील. दहा-बारा जणांचा ट्रेकर्सचा ग्रुप आणि त्यांच्या फालतु गप्पांनी जाग आली. आधीच उन्हाळ्याच्या मे महिन्यात सुद्धा वातावरण पार गारठून गेलेलं. "उन्हाळा आहे, कशाला पाहिजे चादर न स्वेटशर्ट,चला ! थंडी नाही पडणार एवढी. " अशा तयारीने आम्ही ट्रेकला निघालेलो. आता चांगली हुडहुडी भरली होती,पावणे दोन तासापैकी अर्धा तास झोप लागली असेल. त्यात भर म्हणुन या ग्रुपचा गोंगाट. आजकाल ट्रेकिंग चं फ्याड एवढं वाढलंय की, ट्रेकिंग करतानाचे काही पथ्ये असतात,नियम असतात याचाच लोकांना विसर पडलाय. ट्रेकिंग म्हणजे फक्त बोंबलत फिरणे,आरडाओरड करत लोकांची टिंगल करणे,डोंगर-टेकड्या चढुन माथ्यावर ओल्या पार्ट्या साजऱ्या करणे हेच होऊन बसलेत. त्या लोकांना जराही काही वाटत नव्हते की "आपण जिथे गोंधळ घालतोय,तिथेच दुसरा ग्रुप झोपेत आहेत." शेवटी त्यांना गप्पं बसायला सांगावं लागलं. आलेला ग्रुप पांगला. थोड्या वेळात आम्ही उठलो,पटापट आवरून चालायला लागलो. माथा उतरत असतानाच पश्चिमेकडे सिंहगडाचे आणि पूर्वेकडे नित्यनेमाने उगवणाऱ्या सुर्यनारायणाच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पहाटेच्या फुटलेल्या तांबड्याचे दर्शन झाले. या डोंगराचा माथा उतरून परत पुढचा डोंगर चढायला सुरुवात केली. उजवीकडे खडकवासला जलाशय, पहाटेच्या धुकट वातावरणाची चादर पांघरून सकाळच्या कोवळ्या उन्हाची वाट पाहत अजूनही बिछान्यात असल्यासारखे जाणवले. जवळपास दोन ते तीन डोंगर चढून उतरायचे होते. क्षणार्धात, रात्रभर पाय फुटेस्तोवर भटकंती केलेल्या डोंगरांच्या कुशीतुन सुर्योद्यास सुरवात झाली आणि लाल-तांबड्या ठिपक्याने आम्हाला कृत्यकृत्य केलं. माथ्यावर आलो तेव्हा कोंडाणा कोवळं उन्हं पडल्यामुळे सोनेरी रंगात न्हाऊन निघाला होता. मागे वळून पहिले तर सह्याद्रीतली ही भुलेश्वर डोंगररांग पावसाची आतुरतेने वाट पाहत होती. याच डोंगररांगेत सासवड जवळ मल्हारगड(सोनोरीचा किल्ला) आणि कानिफनाथांचा डोंगर विसावले आहेत. 





शेवटचा माथा उतरून, करवंदाच्या झाडीत शिरलो. सकाळी सकाळी डोंगरातल्या काळ्या मैनेला भक्ष्य करून नाश्ता आटोपला. डोंगरातली काळी मैना म्हणजेच करवंद बरं का !(नाहीतर गैरसमज होईल,ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी).करवंदाच्या झाडीतुन बाहेर पडत आम्ही एकदाचं रस्त्याला लागलो. आणि काय सांगु "डझनभर डोंगरांची पायपीट करून आल्यानंतर या सपाट रस्त्याला चालणे म्हणजे स्वर्गसुखच !" इथून शिवापूर १२ किमी. आणि सिंहगड अजुन ३ किमी. चालणे रास्त होते. न थांबता घाटातुन चालायला सुरवात केली. पावसात हिरवी शाल पांघरलेला सिंहगड, ज्याचे अनोखे सौंदर्य अनुभवायला गाड्यांची पार शिवापूर फाट्यापर्यंत गर्दी होते, जिथे धो-धो पावसात यावेळी गरमागरम पिठलं-भाकरी आणि कांदा भज्यांची रेलचेल असते,त्यावेळी आता मात्र आम्ही भटके राकट कोंडाण्याकडे कौतुकाने पाहत पुणे दरवाज्याचे अंतर कमी करत होतो.कधी कधी अंतिम लक्ष्यापेक्षा ते लक्ष्य गाठण्यासाठी चाललेली धडपड,खटाटोप अधिक सुखावह ठरते,याचा अनुभव आज येत होता. आम्ही चालत असतानाच,गाड्यांमधून फिरायला आलेले(पर्यटक) जमेल तितक्या हावभावाने आमच्याकडे पाहत पुढे जात होते. रस्त्याच्या बाजुला भर उन्हाळ्यात फुललेल्या गुलमोहराने परत एकदा मन वेडावून टाकले. काय निसर्गाची कमाल नाही! रणरणत्या उन्हात फुलणारा लालभडक गुलमोहर.पुणे दरवाज्याच्या खाली पोहोचलो तेव्हा सकाळचे साधेसात-आठ झाले असावेत. गरम व्हायला सुरुवात झाली होती. लगेच पुणे दरवाजा गाठला आणि टाक्यातले गार पाणी पिऊन हुशार झालो. एका दमात काही खाण्याच्या आधीच सिंहगडाची सफर केलेली बरी, म्हणुन निघालो. 

सिंहगड उर्फ कोंडाणा. वीर तानाजीच्या शौर्याची आठवण करून देणारा कोंडाणा! स्वराज्याच्या अनेक चढउताराची साक्ष असणारा कोंडाणा! आणि आता दुर्दैवाने वीकेंड ला मौज-मजा करण्याचे डेस्तीनेशन बनलेला कोंडाणा? ………. असो. तर बापूजी देशपांडे यांच्या मदतीने महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. त्यानंतर शहाजी महाराजांची सुटका,पुरंदरचा तह,संभाजी महाराजांचा मृत्यु, अशा एक-अनेक कारणांमुळे तो मुघलांकडून स्वराज्यात आणि स्वराज्यातून मुघलांकडे वाऱ्या करत होता. शेवटी ब्रिटिशांनी जिंकुन घेतला. 

गड फिरायला सुरुवात केली. लोकमान्य टिळकांचा वाडा. असं म्हणतात ही जागा टिळकांनी एका रामलाल नाईक नावाच्या व्यापाराकडून घेतली. आता ह्या नाईकाकडे ही जागा कशी आली? ,देव जाणे. वाडा बंद करून ठेवलाय, पाहता येत नाही. राष्ट्रपिता आणि लोकमान्यांची भेट या वाड्यावर झाली होती. वाडा पर्यटकांसाठी खुला करायला हरकत नाही असं वाटून गेलं,असो. छत्रपती राजारामांच्या समाधीकडे वळलो. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी सिंहगडावरच निधन झालेल्या राजारामांची समाधी राजस्थानी पद्धतीने बांधली आहे. आजुबाजुचे दोन-तीन पाण्याचे टाके एकदम स्वच्छ होऊन पावसाची वाट पाहत होते. समाधी पाहुन तानाजी कड्याकडे चालायला लागलो,तोच मध्ये देवटाक्याचे अमृततुल्य पाणी पिऊन तृप्त झालो. सिंहगडाचे वडील बंधु असल्यासारखे तोरणा-राजगड या दुर्ग जोडीने आम्हाला दर्शन दिले. सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड ही पदयात्रा खुणावत होती. बाजुला कुठलाशा ट्रेकिंग कंपनीचे तानाजी कड्यावर valley crossing चाललेले. कल्याण दरवाज्यापाशी येउन थांबलो.इथे एका मागोमाग एक असे दोन दरवाजे आहेत,कल्याण गावातून आपण या दरवाज्यातुन गडावर पोहोचतो. अशा अनेक ऐतिहासिक वास्तु बघुन आम्ही परत फिरलो. पिठलं भाकरी वर ताव मारून घराची वाट धरली ती अजुन एका अविस्मरणीय भटकंतीची आठवण मनात साठवुन .