रणरणत्या उन्हात, सावली देवराईची !

2 comments:
फाल्गुन संपला. चैत्राची गुढी यावर्षीच्या विक्रमी तापमानात उभारल्या गेली.वैशाखवणवा चैत्रातच पेट घेतो की काय, असं वाटत होतं. एवढा चैतन्यमयी मराठमोळा सण उन्हाच्या रखरखाटात साजरा करावा लागतो,याचं मला नेहमीच अतिशय वाईट वाटतं. पण निसर्गाने काहीतरी ठरवूनच ही तिथि निवडली असणार. त्याचं कारण आपल्यासमोरच उलगडत असतं, वसंतऋतुचं आगमन झालेलं असतं. या उन्हातच झाडांना पालवी फुटायला सुरवात होते, आंब्याला मोहोर येऊन ते पिकायला सुरवात होते.स्वच्छ निळ्या आकाशात नारायणराव खुल्या मनाने तळपत असतात. आता तेवढा उन्हाचा भाग सोडला तर मन सह्याद्रीमंडळात मुक्त हिंडायला एका पायावर तयार असतं. पण यावर्षीचा एकंदरीत उन्हाळा बघता बाहेर पडायला जीव मागेपुढे बघत होता. कुठेतरी जाऊन यावं, पण कुठे हे नक्की सुचत नव्हतं. योगेशने अहुपे घाट सुचवला, पर्याय चांगला असला तरी कोंकणातून चढाई आणि ती या उन्हात म्हणजे. थोडी द्विधा मनःस्थिती होतीच. पण योगेशने, त्याची पाच वर्षाची मुलगी "चार्वी" सोबत येते म्हटल्यावर माझं मत ठाम झालं आणि होकार कळवला.