उंबरठ्यापलीकडील जग...'राज'माची

13 comments:
उंबरठा ! घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओलांडला असे म्हणता येत नाही,कारण जी गोष्ट आपण रोज करतो,गरजेसाठी करतो, ज्यात तोचतोचपणा असतो,तेव्हा विशेष असं काही वाटत नाही. प्रत्येक गोष्टींमधून आनंद घ्यायला अर्थातच त्यात नाविन्याची गरज असते,घरातुन बाहेर पडण्याची गरज असते म्हणजेच कंटाळवाण्या जगातून तुम्ही बाहेर पडून जर नवीन भरारी घेण्यास तयार असाल तेव्हा खऱ्या अर्थाने उंबरठा ओलांडला असं मी समजेन. निदान माझ्या बाबतीत तरी तसंच आहे, माझ्या आवडत्या डोंगर भटकंतीमध्येही मी जेव्हा तोचतोचपणा आणतो,तिथे समाधानाची अपेक्षा मी कशी करणार. असो  लिहिण्याचे कारण की गेली चार महिने पायांना डोंगरवाट लाभलेली नाही, डोळ्यांना सह्यरांगेतला सूर्योदय-सूर्यास्त दिसलेला नाही. दऱ्या-खोऱ्यातला भरार वारा पिऊन तप लोटल्यासारखं वाटतंय. हव्याहव्याश्या वाटणाऱ्या पायांच्या दुखण्याचे विस्मरण व्हायला लागले. कधी कधी पायातली तिडिक डोक्यात जाते,पण चार पावले पुढे जायला दोन पावले मागे येण्याचा सल्ला अंतर्मन देऊन जाते. मग एखाद्या शनवाऱ्या पहाटे सिंहगडाची पायवाट तुडवली जाते. पण इथेही उंबरठा ओलांडण्याचे समाधान लाभत नाही,शेवटी सिंहगड चढुन उतरणे हाही एक दैनंदिनीचाच भाग, नाही का !