रणरणत्या उन्हात, सावली देवराईची !

2 comments:
फाल्गुन संपला. चैत्राची गुढी यावर्षीच्या विक्रमी तापमानात उभारल्या गेली.वैशाखवणवा चैत्रातच पेट घेतो की काय, असं वाटत होतं. एवढा चैतन्यमयी मराठमोळा सण उन्हाच्या रखरखाटात साजरा करावा लागतो,याचं मला नेहमीच अतिशय वाईट वाटतं. पण निसर्गाने काहीतरी ठरवूनच ही तिथि निवडली असणार. त्याचं कारण आपल्यासमोरच उलगडत असतं, वसंतऋतुचं आगमन झालेलं असतं. या उन्हातच झाडांना पालवी फुटायला सुरवात होते, आंब्याला मोहोर येऊन ते पिकायला सुरवात होते.स्वच्छ निळ्या आकाशात नारायणराव खुल्या मनाने तळपत असतात. आता तेवढा उन्हाचा भाग सोडला तर मन सह्याद्रीमंडळात मुक्त हिंडायला एका पायावर तयार असतं. पण यावर्षीचा एकंदरीत उन्हाळा बघता बाहेर पडायला जीव मागेपुढे बघत होता. कुठेतरी जाऊन यावं, पण कुठे हे नक्की सुचत नव्हतं. योगेशने अहुपे घाट सुचवला, पर्याय चांगला असला तरी कोंकणातून चढाई आणि ती या उन्हात म्हणजे. थोडी द्विधा मनःस्थिती होतीच. पण योगेशने, त्याची पाच वर्षाची मुलगी "चार्वी" सोबत येते म्हटल्यावर माझं मत ठाम झालं आणि होकार कळवला.

पश्चिमेचा गार वारा....!

8 comments:
गेलं वर्ष ट्रेकच्या नावाने चांगलंच दुष्काळग्रस्त निघालं, तेवढी गौताळ्याची आडवाटेवरची किल्लेगिरी अन् सवाष्णी-वाघजाईची व्हाया ठाणाळे रपेट सोडली तर पायांना कुठे तंगडतोड नाही की खांद्यांना कुठे पिट्ठूचे काचे नाही. घामाने निथळलेली पाठ जमिनीवर कुठे टेकवलेली आठवत नाही, खडकातलं गारेगार पाणी पिऊन कितीतरी वर्षे लोटली असं वाटतंय, या सह्याद्रीची इतकी सवय होऊन गेलीये की गेलं वर्ष माझं मी कसं काढलंय हे मलाच माहिती. या सह्यमंडळाच्या मायेच्या ओलाव्याशिवाय आयुष्य सगळं शुष्क आहे,हे मात्र कळुन चुकलं. सासुरवाशीण जशी वाट बघतीये, कधी माहेरची माणसे येतील आणि तिला माहेरा घेउन जातील, अगदी तशीच अवस्था झालीये अस्मादिकांची !  आणि तसं बोलावणही आलं होतं सह्याद्रीचं, तसं ते नेहमीच आलेलं असतं म्हणा. पण यावेळी मी त्याच्या हाकेला "" द्यायचं ठरवलंच होतं. म्हटलं चला आता पुन्हा एकदा नव्याने सुरवात करायला हरकत नाही.
बाहेर उन्हाचा दाह वाढत असला तरी आता मला कुणाची पर्वा नाही. फाल्गुनोत्सव जवळ येतोय, सह्यमंडळात लालभडक पळस फुलला असणार. करावंदांना मोहर आला असणार, तशी करवंदीची चव चाखायची म्हणजे मे जुनशिवाय पर्याय नसतो. पण किमान त्याचा मोहर बघुन तरी यावं. आंब्याची झाडे सूद्धा बहरली असणार, त्याचा सुगंध घेऊन यावं. या डोंगरातलं जीवनच वेगळं असतंनाही ? , स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सिमेंटच्या जंगलात अनुभवता न येणारा असा निर्मळ सूर्योदय-सूर्यास्त. पण कधी कधी भीती वाटते, आपण जसा विचार करतोय तोच विचार हे डोंगरवासी करीत असतील का ? तर ती भीती इथे खरी ठरते, कारण त्यांनाही डोंगरात राहून उबग आलेला असतो, शहरी लोकांपेक्षा ह्या लोकांचे प्रश्न फार वेगळे आहेत, तेही मुलभुत. आणि ते स्वभाविक आहेत, त्यांनाही चांगले रस्ते,वीज,पाणी ह्या सर्वांची गरज भासतेच. शहरात आली की मग ही माणसं हुरळून जातात. शेवटी माणसाला बदल हवा असतोच. अन् त्याच बदलाच्या पायी आपण डोंगरांची वाट जवळ करतो, हेतु प्रत्येकाचा वेगळा असु शकतो. नाही का ?

किल्लेगिरी आडवाटेवरची ! ... वैशागड, वेताळवाडी !!

5 comments:
पहाटे जाग आली तेव्हा कुठल्यातरी गावाच्या वेशीवर पोहोचलो होतो, गाडीच्या बाल्कनीत पिशव्यांच्या गराड्यात रात्रभर दूमडुन घातलेली माझी घडी विस्कटली आणि डोळे चोळतच आजुबाजुला बघुन घेतलं तोच पुढ्यात बसलेला साकेत वदला, "झाली का झोप ?" वाटत होतं, मी सोडुन गाडीतलं अक्खं पब्लिक जागी होतं. अंभईच्या वेशीवर भीमपहाट उगवली होती. टिपू सुल्तान चौकातुन गाडी गावातुन बाहेर पडली आणि पहाटेच्या प्रसन्न(?) वातावरणात बहरलेली जवळ जवळ एकाच रंगाची फुले चुकवीत आमची स्कॉर्पियो एकदाची वैशागडाच्या वाटेला लागली, एव्हाना उजाडलं होतं. वळणावळणाच्या रस्त्यावरून गाडी सुसाट सुटली होती. ढगाळलेल्या आकाशाखाली जंजाळ्याच्या टेकाडावर गाडी थबकली तेव्हा गावाच्या डावीकडचा घेरेदार वैशागड,आता पायगाडी सुरू होणार याची कल्पना देऊन गेला.
गाडी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत जाते ही माहिती यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने खोडून काढली, त्यामुळे "गाडी किल्ल्यात पोहोचली असती तर बरं झालं असतं ",असा सर्वांचा एकंदरीत सुर ! तो आवरता घेत आम्ही गडाच्या वाटेला लागलो. "किल्ला साढ़ेतीनशे एकरात पसरला आहे", इति हर्शल. एवढा मोठा किल्ला ! म्हणजे धुंडाळण्यासारखं बरंच असलं पाहिजे. आणि खरं सांगायचं तर माझा वेळेच्या अभावी किल्ल्यांबद्दलचा पूर्वाभ्यास यावेळी बारगळलाच होता. आणि तसंही एवढी हुशार मंडळी ट्रेकला असेल तर त्याची गरज ती काय. त्यातल्या त्यात नाशिक आणि परिसरात भरपुर भटकलेला खुद्द कुळकर्ण्यांचा हर्शल आम्हाला लीड करत होता आणि ट्रेकचा संपुर्ण प्लॅन हा खुद्द शब्दभास्कर ओंकार यांच्या मार्गदर्शनाखाली आखल्या गेला होता.ट्रेकला तो नसला तरी प्लानच्या स्वरूपात तो सोबतच होता. त्यामुळे वेगळी अशी चिंता नव्हती. किल्ल्यात जाणारी पायवाट म्हणजे पायवाटच म्हणायला पहिजे कारण चढ जवळजवळ शुन्यच दिसत होता, त्यामुळे इथे ट्रेकिंग नव्हे तर फक्त किल्लेगिरीच करायची होती. हे प्लॅनमधल्या जवळजवळ सर्वच किल्ल्यांच्या बाबतीत होतं.