भटकंती दुर्ग त्रिकुटांची : अलंग -मदन-कुलंग

ब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या "१९ डिसेंबर २०१४" या अंकात प्रकाशित झालेला आहे ,
त्याची epaper -link :  लोकप्रभा अंक -१९ डिसेंबर २०१४  पान क्र. ६८ च्या पुढे ……




मस्त जुळून आलीये संध्याकाळ,शैल कळसूबाईचं भगवं मंदिर आता थोड्याच वेळात दिसेनासं होईल,आता अंधारही होत आलाय. सगळीकडे नीरव शांततेचं साम्राज्य आता हळुहळु ह्या  सांजवेळेला कवेत घेणार असं दिसतंय. आवाज फक्त वाऱ्यांचा,कानापासुन भरर्र करीत जाणाऱ्या रातकिड्यांचा अन् रात्रीच्या झोपेची तयारी करणाऱ्या रानपाखरांचा.चांदण्याही नटून थटून नभांगणात अवतारतायेत. चंद्रही आता डोईवर आलाय. पायथ्याचं आंबेवाडीही दिव्यांच्या उजेडात लुकलुकतय. मी मात्र एकटा अलंगला गेलेल्या टीमची वाट पाहत बसलोय,मदन अन् अलंगच्या खिंडीत ! मदन आणि अलंग्याचे दोन महाकाय डोंगर जणू दंड थोपटून माझ्या आजुबाजुला उभे ठाकले आहेत असं वाटलं. आधी भीती वाटून गेली पण मग झाली मैत्री आमच्यात! टीमला यायला वेळ लागेल असं ग्रुहीत धरून मी आपलं लिहीत बसलोय आजचा लेखाजोखा. पहाटेपासुन आतापर्यंत घडलेला !

आजचा दिवस निघालाच तो आंबेवाडीतल्या कुडकुणाऱ्या थंडीने, रात्रीच पोहोचलेल्या पुणे अन् मुंबई या दोन्हीकडच्या ट्रेकर मंडळीनी पहाटे पहाटे गारठयाचे गोडवे गायला सुरवात केली होती. मग थोडा वेळ प्रत्येक जण कूठे अन् कसा झोपला,हे ऐकण्यात  गेला. लखनच्या पडवीत पहाटेचा चहा- नाश्ता झाला, महत्वाच्या सूचना,प्रत्येकाचं थोडक्यात आत्मचरित्र ऐकून समानांची आवराआवर झाली. गिर्यारोहणाचं साहित्यवाटप करून आम्ही मिशन अलंग- मदन- कुलंग या सह्याद्रीतल्या सर्वात दुर्गम त्रिकुटाकडे रवाना झालो. दोन दिवसांच्या 30- एक जणांच्या जेवणाच्या सामानांसह राशन,भांडी,इत्यादी इत्यादींनी प्रत्येकाच्या सॅक काठोकाठ भरल्या होत्या. आता वाऱ्यालाही जागा नव्हती उरली आत,बाहेर मात्र सकाळच्या मंद वाऱ्यासह गारठा जाणवत होता. तिकडून कळसूबाईच्या मागून नारायणराव घाईघाईने कामावर रजु व्हायला निघालेले !  त्रिकुटही हळूहळू जागे होत होतं. अलंग अन् कुलंग या दोघांच्या मध्ये मदनाचा पुतळा भाव खाऊन गेला. शेतातून आत झाडीत शिरलो. उन्हें वाढत चालली असली तरी,झाडोऱ्यामुळं गारठा काही कमी नव्हता होत. आस्ते कदम करीत चाललोय,थोडा वेळ कुलंगने साथ केली नंतर तोही मदनआड झाला. आता पुढ्यात होता पसारा फक्त अलंगचा . उभा नैसर्गिक तासलेला कडा तर अप्रतिम! मनाच्या कोपऱ्यात जाऊन भीडला.  ट्रॅव्हर्सेसचा मेरुमणी समजल्या जाणाऱ्या या अलंग्याचे रूपच न्यारे. अन् उजव्या बाजूला मदन आभाळात घुसला होता. किरडा डोंगर डाव्या बाजूला ठेवत,पठारावरुन आत शिरलो की नुसती झाडी. अर्थातच पुढचा ग्रुप बऱ्यापैकी वर पोहोचला होता,मी,योगिता अन् पूजा मागच्याना पुढे सरकवत चाललोय. थोड्याच वेळात अगरबत्तीच्या मंद सुवासाने हनुमानशिल्प जवळ आल्याची खात्री पटली. जंगलातल्या वाटेचा आनंद घेत आपण शिल्पाजवळ पोहोचतो,राक्षसाला पायाखाली तुडविलेला दगडात कोरलेला हनुमान शेंदूराने रंगवलेला आहे.  थोडा पोटोबा म्हणून थांबलो. हनुमानशिल्पाजवळ शेंडे काकांनी आणलेल्या खारकाच्या चूऱ्याने मजा आणली. पाणी पिऊन विना ब्रेक आम्ही अलंगच्या खालच्या गुहेत जाऊन धडकलो. इथेच बाजूच्या गुहेत पाण्याची सोय असल्यामुळे आमच्या सपोर्ट टीमने स्वयंपाकाचं ठाण मांडलं. या टीमची खासियत म्हणजे सगळे जण जिम,पहलगाम मधुन सर्टीफाईड भटके अन् जेवण बनवण्यात सगळ्यांचा हातखंडा. टेस्ट मे बेस्ट ! आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांची एकमेकांसोबत जुळलेली वेवलेंग्थ. ट्रेकरच्या भाषेत सांगायचं तर, आम्हा सगळ्यांची या डोंगरदऱ्यामध्ये पुरलेली नाळ! "योगिता,रेश्मा,पूजा अन् पल्लवी अब तुम्हारे हवाले "जेवण" साथियों",असे म्हणत आम्ही पुढच्या कामास लागलो.
खरं थ्रील आता सुरू होणार होतं. आंबेवाडीच्या कैलाशने फ्री क्लाइंब करून आधीच अलंगचा सरळसोट 50 फूटी रॉक प्याच सुरक्षित केला होता. त्या खालचा 25 फूटी पण दोराने सुरक्षित केलेला. प्रसाद अन् दीपक 12 जणांना घेऊन मदनकडे रवाना झाला. 11 जणांना घेऊन मी अन् विद्युत आधी अलंग सर करणार होतो. खालची सोपी चढाई करून एकेकजण वर पोहोचले. वरुन विद्युत बिल्ये देत होता, खालून प्रत्येकानी आपापल्या परीने अलंगचा सुप्रसिद्ध रॉक क्लाइंब केला. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या टीममधल्या प्रत्येकाने स्वतःहून प्रयत्न केला,कुणाला खेचायची गरज भासली नाही. वरच्या गुहेत पोहोचलो की पुढे चढायला कातळातल्या खोदिव पायऱ्या. या पायऱ्या पण नीट सांभाळून चढायच्या कारण थोडी जरी गफलत झाली की,शंभर टक्के कपाळमोक्ष खाली दरीतच. हे सगळे सोपस्कार पार पाडुन आम्ही गडमाथ्यावर पाय रोवला आणि सर्वात आधी गडावरील जुळ्या टाक्यांनी आमचं स्वागत केलं. त्याच्यापुढे भग्नवस्थेत शिवलिंग,असंच विनाछप्पर ऊन-वारा झेलत कसं तरी तग धरून राहिलेलं. इथे पोहोचल्या पोहोचल्या गडाचा आवाका नजरेत भरतो. U आकाराचं हे पठार वाळलेल्या गवताच्या सोनेरी रंगांनी न्हाऊन निघालं होतं. इथूनच गडावरील गुहांनी साद घातली आणि आम्ही तिकडे चढायला सुरुवात केली. इथले गुहेचे दोन संच खरच पाहण्यासारखे आहेत. पैकी एकामध्ये 40- एक जणांची राहण्याची आरामात सोय होऊ शकते. उजवीकडच्या गुहॆ समोर एक पाण्याचे टाके अन् गणेशशिल्प कोरलेले आढळते. बाकी गुहेच्या आतून त्रिकुटा तील कुलंग आणि मदन यांचा नजारा अप्रतिम ! ह्या गुहा बौद्धकालीन असाव्या. दुमजली असलेल्या गुहेच्या वर जायला कोरीव जीने काढले आहेत. असच आपण न्याहळीत राहिलो तर सगळं कल्पनेपलिकडचं वाटतं. एवढ्या दुर्गम उंचीवर हा सगळा खटाटोप करायची कुणाला सुबुद्धि सुचली असेल असंच वाटत राहतं. आजुबाजुला अस्ताव्यस्त पडलेले बांधकामाचे अवशेष, काळाच्या मार्यात सापडलेल्या दरवाज्याच्या कमानी मन विषन्न करतात.  गडफेरी इथेच संपत नाही, अजुन एक टेकाड आपल्यासमोर उभं ठाकलेलं दिसतं आणि त्यावरील सुस्थितीत दिसणारं बांधकाम साद घालत राहतं. पण तिथे पोहोचायच्या आधीच वाटेत लागणाऱ्या दशकुंड जलाशय, अर्थात कातळात खोदलेल्या दहा - एक आखिव- रेखीव टाक्यानी स्तिमित व्हायला होतं. निळ्याशार आकाशाखाली या टाक्यांचा समूह ! हे चित्रच कमाल ! आणि त्यातल्या पाण्याची क्वालिटी म्हणाल तर तुमचे ते फिल्टर,फ्रीजर यांच्या पार पल्याड. जबरदस्त ! या टाक्यांच्या उताराकडे एक धरणासारखी भिंत बांधून काढलीये. अन् जास्तीचे पाणी वाहून जायला छोट्या छोट्या मोऱ्या,खरच अप्रतिम नियोजन. या अमृततुल्य पाण्याने पोटोबा झाला अन् वाड्याकडे मार्गस्थ झालो.

बहुदा किल्लेदाराचे निवासस्थान असलेल्या या वाड्याचे बांधकाम दुरुनच भव्यदिव्य वाटते. किल्ल्याच्या माथ्यावर कुठूनही उठुन दिसणारी ही एकमेव वास्तू. पण जवळ जाताच लक्षात येतं याची एकच बाजू शाबूत आहे,बाकी पूर्णतः जमीनदोस्त. आतली इमारत अवशेषांमध्ये मोजल्या जाते,पण हे लक्षणीय बांधकाम गतकाळातील इतिहासाची छाप सोडून जाते. कितीतरी उन्हाळे- पावसाळे पहिले असतील या वाड्याने? भरार् वाऱ्यात कसातरी तग धरून उभा आहे. काय घडलं असेल इथे,कोण राहिलं असेल इथे,किती आणि कोणत्या राजवटी नांदुन गेल्या असतील, असे किती प्रश्न मन विचारू लागलं. पण इतिहासात गेलं की,या किल्ल्याचा उल्लेख फार काही सापडत नाही,आपलंच दुर्दैव. सर्वपरिचित भूतकाळ म्हणजे 1818 मध्ये इंग्रजांच्या हल्ल्यात सर्वस्व गमावलेला अजुन एक गिरीदुर्ग! अर्थातच त्याआधी तो मराठयांकडे होता. पण त्याहीआधीचं पान इतिहासात नाही सापडत. असो,सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो तेव्हा श्रीकिरडाच्या मागे कळसूबाईचं ठाण खूणावुन गेलं. गडफेरी आटोपून परतीला लागलो,अलंग्यावरुन मदनाच्या तेवढ्या पायऱ्या पहायच्या राहिल्या होत्या. आणि काय सांगू काय दिसत होता मदनाचा पुतळा! दोहोंच्या मधल्या 30- एक मीटर अंतराच्या दरीने धस्सच झालं आणि येथून दिसणाऱ्या कातळतल्या खोदिव पायऱ्या तर अप्रतिम.
 

उतरायला सुरवात केली तेव्हा प्रसाद अन् दीपकची टीम मदनगडाच्या वरच्या पायऱ्या उतरत होती. चला,सगळं वेळेनुसार चालल्याची खात्री पटली. एकेक जण रॅपलिंग करून अलंगचा patch पार करु लागले. खालच्या गुहेत जेवणाचा फक्कड बेत जमला होता, आलू-मटार-चपातीवर आडवा हात मारत सगळ्यांची जेवणं आटोपली,मदनला गेलेली टीमही हळूहळू परतत होती. दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर आम्ही मदनकडे रवाना झालो. डावीकडचा अलंगचा ट्रॅव्हर्स पार केला की आपण मदन आणि अलंगच्या खिंडीत येऊन पोहोचतो. आंबेवाडीतून येणारी नाळेची वाट ही इथेच येऊन मिळते. उजवीकडच्या पायवाटेने मदनावर चढाईला सुरवात केली तेव्हा गेल्या वर्षी अरूण सरांसोबत केलेल्या हौद साफसफाईच्या आठवणींना उजाळा मिळाला,त्या हौदात पाणी साठलं असेल का ? ही उत्सुकता होतीच. पायऱ्या चढत,खालच्या दरीचा आढावा घेत घेत जसजसे आपण वर चढतो तसतसा अलंग आपल्यासमोर स्वतःचं रूप पेश करत असतो. आता मात्र आपण 25 फूटी कड्याजवळ येऊन पोहोचतो आणि कुलंग आपल्या बाजूला उभा ठाकतो. हे सगळं करून दुसऱ्या दिवशी आपल्याला हा अवाढव्य डोंगर चढायचा आहे या कल्पनेनेच धडकी भरते. असो तूर्तास प्रसाद मदनच्या वरच्या patc ला बसलाय आणि बिल्ये देतोय. तुलनेने सोपा असलेला हा कडा येन्गायला वेळ नाही लागला. परत ट्रॅव्हर्सला लागलो आणि अलंगच्या नैसर्गिक तटबंदीने पुन्हा लक्ष वेधून घेतले. येथून परत पायऱ्या,त्या चढत गेलो की दरवाजा ओलांडून गडमाथा ! आणि सर्वात आधी मी टाक्यांकडे वळलो,फार फार बरं वाटलं कारण टाकी नितळ पाण्याने तुडुंब भरली होती. याखेरीज गडावर धुंडाळण्यासारखं म्हणजे एका अखंड दगडात कोरलेली भली मोठी औरस - चौरस गुहा आणि वर टेकडावर चौकी- पहाऱ्याच्या जागेचे अवशेष ! आजुबाजुला जिकडे नजर जाईल तिकडे पसरलेला आडवा- तिडवा सह्याद्री !

आणि काय सांगु काय दिसत होता सह्याद्री! माझा सह्याद्री! अफाट,अभेद्य,अजिंक्य सह्याद्री! खाली अलंगगडाचा पसारा नजरेस भरला,थोड्या वेळापूर्वी आपण तिथे होतो याचीच मजा वाटून गेली. बाकी मदनगडावरुन आता अलंग भाव खाऊन गेला, तसेही त्याचं ह्यापेक्षा अजुन सुंदर दर्शन कोठून होणार ! महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सर्वात उंच डोंगरशिखरांची मांदियाळी ही इथेच! सगळ्यांची उंची ही सरासरी पाच हजार फूटांजवळ पोहोचलेली. सर्वात ऊंचावर असलेल्या कळसुबाईंच्या ठाण्यापासुन उजवीकडे,छोटा कळसुबाई,श्रीक़िरडा,अलंग,घन्चक्कर,कात्राबाई,आजोबा,कुलंग हे महारथींची भलीमोठी रांग जणु अस्ताला जाणाऱ्या दिवाकरास सलामी देतायेत असं वाटत होतं. कुठे रतनगड डोके वर काढतोय,कधी त्याचा खूँटा स्वतःचं अस्तित्व जाणवतोय. कुठे डांग्या सुळक्या खुणावतोय. खाली घाटघर अन् सांधण दरी मागल्या भेटीची आठवण करून देतायेत,पश्चिमेकडचा जलाशय सांजवेळची सूर्यकिरणे झेलत पहुडलाय,कधी तिकडे तो पट्टा विश्रामासाठी निमंत्रण पाठवतोय असं वाटत होतं. मस्त मस्त !!
गडफेरी आटोपून आम्ही उतरायला सुरवात केली,पायऱ्या उतरताना दरीची भीषणता जाणवून गेली. दिवाकरराव जगाचा निरोप घेत पश्चिमेकडे कलत होते आणि सांजवेळ प्रकाशात आम्ही खिंड जवळ करत होतो. खिंडीत पोहोचलो तेव्हा आमची सपोर्ट टीम हजर होती. आणि रिकाम्या हाताने नव्हे तर, रात्रीच्या जेवणाचं पाणी घेऊन. वाह ! याला म्हणतात "मॅनेज्मेंट"! अशा छोट्या छोट्या "शॉट" मधुन जेव्हा धावांचा पाऊस पडतो ना,तेव्हा खरी मजा येते आणि स्वतःचच कौतुक वाटून जातं. संध्याकाळचे पावणे- सात. अरुण सरांनी काही वर्षांपूर्वी मदनचा ट्रॅव्हर्स शोधुन काढला होता,त्याच वाटेने उद्या आम्ही कुलंग जवळ करणार होतो अन् आमचा आजचा मुक्काम वाटेत लागणाऱ्या घळीत असणार होता. प्रसाद टीममदनला घेऊन त्याच वाटेने पुढे गेला आणि मी टीमअलंगची वाट पाहत खिंडीत बसलो. अन् ते येईपर्यंत दिवसभराचा लेखा जोखा लिहून झाला,त्यात तब्बल सव्वा तास गेला. काही वेळात दीपक अन् विद्युत त्यांच्या टीमसह खिंडीत पोहोचले आणि पुढच्या अर्ध्या तासात आम्ही पण घळीत येऊन विसावलो.
 

आम्ही पोहोचलो तेव्हा सूप संपलं होतं,घळीतल्या एका कोपऱ्यात चुलिवर रात्रीचा बेत शिजत होता अन् बाजूला रेश्मा ठाण मांडून बसलेली ! तिकडे प्रत्येकाने आपापल्या जागा बळकावून दिली होती ताणून. सोयाबीनच्या वड्या घालून जमवलेल्या त्या "व्हेज बिर्याणी"ला खरच तोड नव्हती. गरमगरम अन्न पोटात घालून झोपी गेलो ते तांबडं फुटेस्तोवर ! सकाळी उठल्या उठल्या डोळ्यांसमोर आला तो रतनगड - कात्राबाई - आजोबा या त्रिकुटांचा भव्यदिव्य नजारा. खाली घाटघर जलाशयातून मंद वाफारे वर येत होते. एकदम "दिन बन गया",  देखावा ! सगळे चहा पीत बसलेले तेवढ्यात पाटलांचा रोहन किंचाळला,"आईSSशप्पत,मी रात्री जेवलोच नाही !",रोहनच्या या ओरडण्यने सगळे गांगरुन गेले. नंतर कळलं,त्याचा मित्र राहुल,हा जेवला असेल असं समजून त्याला रात्री उठवायला विसरला. बाकी दोघांचाही चेहरा बघण्यासारखा झाला होता. आवराआवर सुरू झाली,आज एकाच टीम मध्ये सगळे कुलंग सर करणार होते आणि आमची सपोर्ट टीम आंबेवाडीकडे परतीच्या प्रवासाला लागणार होती. सगळं आवरुन आल्या वाटेनेच आम्ही कुलंगकडे ट्रेकस्थ झालो.

जसजसे पुढे सरकतोय,तसतसा या वाटेनी रंग दाखवायला सुरुवात केली ,डाव्या बाजूला जवळपास हजार फूटांचा फॉल आ वासुन होता,उजव्या बाजूला कूठे झाडीच्या फांदया,कूठे मुळात,कूठे दगडांच्या खाचाखोचात हात घालून ही वाट सर करावी लागत होती. एकतर निमुळती,जवळ जवळ मदनला चिकटलेली,आणि वरुन मुरमाड ! कुणाच्या शूज खालून चर्र असा आवाज झाला की धडकीच भरायची. कारण घसरुन गेला की,डाव्या बाजूला "डाइरेक्ट शिफ्ट- डिलीट"च. त्यामुळे प्रत्येक पाय जपून टाकावा लागत होता. पुढे घसाऱ्यातून झाडोऱ्याला अँकर करीत कुलंगकडून आलेल्या सोंडेच्या आणि मदनच्या सुळक्यांच्या मध्ये पोहोचलो तेव्हा कूठे हायसं वाटलं. आता सोंडेला ट्रॅव्हर्स मारत एकदाचं कुलंगला भीडलो. आता मात्र वाट सगळी झाडीतली. या वाटेने पुढे चालत गेलो की पट उलगडत जावा तसा सह्याद्री उलगडत जातो. सर्वात आधी मदनगडाचा बॅरल शेप समोर येतो,त्याचं नेढं लक्ष वेधून घेतो. नारायणराव थोडे वर आले होते,नेढ्यातून येणारा शुभ्र प्रकाश आणि त्यासमोरील नाकाच्या ठेवणीमुळं तो एक हस्तिदंत वाटून गेला. हळूहळू मदनगडाच्या M3 आणि M4 या सुळक्यांनीही दर्शन दिलं,कळसूबाई तर सुरवातीपासूनच साथीला होता. आणि मग किरडा अन् अलंगमधल्या नवरा- नवरीच्या लग्नाला लहान कळसूबाई अन् श्रीकिरडा यांनीही आपली हजेरी लावली,तोपर्यंत आम्ही कुलंगच्या पायऱ्यांना भीडलो होतो. आता येथून चढाई सगळी उभी. तटबंदी दिसल्यावर अजुन हुरुप वाढला, जवळपास सगळे जण माथ्यावर आधीच पोहोचले होते,शेवटी महेश,सचिन,राहुल आणि मीच राहिलो होतो. पायऱ्या चढताना दमछाक होते खरी,पण थोडं वर गेल्यावर गार वारं सुखावुन जातं. उभ्या खडकात कोरलेल्या खोबणीसारख्या या पायऱ्या चढताना मज्जा येते,पण नीट काळजीपूर्वक पाऊल टाकायचं. चुकून गफलत झाली तर क्षमा नाही. काही ठिकाणी कठडे असल्याने थोडा मानसिक आधार मिळतो अन् दडपण कमी होतं. किल्ल्यात प्रवेश करायच्या आधीच चांगल्या ऐसपैस गुहा कोरलेल्या आढळतात,एकदम गार पडलेलं कातळ,बसायचा मोह आवरत नाही. इथे आडवा झालोच तर काही सेकंदाच्या आत समाधी लागावी. पुन्हा शंभर- एक पायऱ्यांचा कातळ चढून आपण वर येतो तोच एक बुरुजाआड लपलेलं प्रवेशद्वार आपल्या स्वागतास सज्ज असतं. कमानीचा पत्ता नसलेलं हे प्रवेशद्वार मन विशन्न करून सोडतं. पण दगडांच्या एकमेकांवर केलेल्या ठेवणीने अन् त्यांच्या प्रमाणबद्धतेने थक्क व्हायला होतं . 

गडमाथ्यावर पोचल्या पोचल्या आपल्या आनंदाला पारावार नसतो,आभाळ ठेंगण वाटतं आणि अक्षरशः एवढा डोंगर चढून आल्याचा थकवाही नाहीसा होऊन आपण आपल्या पायाला कुलंगचं पठार मोकळं करतो. पाण्याची जोरदार तहान लागलेली असते आणि इथे आल्यावर भव्य टाक्यातले पाणी पिल्यावर न भुतो असं सूख वाटून जातं. इथे असलेल्या पाण्याच्या भल्या मोठ्या टाक्याचा समूह बघून त्यात डुबकी  मारण्याचा मोह आवरत नाही. डाव्या बाजूला वळलो की आधीच्या तीन टाक्यान्च्या मधोमध गणेशाची सुंदर प्रतिमा कोरलेली आढळते,मुख जरी नसलं तरी उर्वरीत शिल्प अजूनही चांगल्या स्थितीत आहे पण तिच्या भग्नवस्थेमुळं वाईट वाटून जातं. अन् शेवटच्या दोन टाक्यांच्या अलीकडे शेजारीच लिंग नसलेली शिवपिंड कोरलेली आढळते. अजुन पुढे गेलो की खडकात खोदून काढलेल्या तीन टाक्याच्या समूहाने स्तिमित झालो,अरे काय हे ? हा किल्ला आहे का टाक्यांचा  मेळाबाजार ? आजपर्यंत कुठल्याही किल्ल्यावर पहिल्या नसतील एवढ्या टाक्याचा समूह या डोंगरयात्रेने एकाच ट्रेकमध्ये दाखवला. पण या समुहाची बांधणी त्यातल्या त्यात खास ! हुबेहूब अलंग गडावरील समूहांसारखी,इथे पण उतारावर बंधाऱ्याची भिंत. त्यामध्ये जास्तीचे पाणी जायला मोरी,विशेष म्हणजे त्या मोरीला एक सुरेख कमान आणि पाणी वाहून जायला गोमुख ! बहुदा गतकाळातल्या शुशोभिकरणाचा प्रयत्न असावा. नव्हे तसंच असणार ! गोमुखांचे फक्त अवशेष उरले आहेत पण हौदाच्या प्रमाणबद्धतेला तोड नाही. इथेही भव्यतेचा साक्षात्कार होतो,कितीतरी ऐश्वर्यसंपन्न राजवटी नांदुन गेल्या असतील.ज्याअर्थी इथे एवढ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात,त्याअर्थी किल्ल्यावर बऱ्यापैकी राबता असला पाहिजे. आता हे सगळं खोद्काम करून निघणारा दगड कूठे वापरणार ? तर इथे वाड्यांचे बांधकामही भरपूर असलं पाहिजे. सारंच गूढ,अगम्य ! त्याच धाटणीचा उजव्या बाजूचा वाडा शेवटच्या घटका मोजत आहे, इथले काळाच्या ओघात निपचीत पडलेले अवशेष गतकाळातील गूजगोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतायेत.
 
या गूजगोष्टी ऐकत ऐकतच आपण गडाच्या पूर्वेकडील माथ्यावर पोहोचतो अन् डोळ्यांच्या एका फ्रेममध्ये न मावणारा सह्याद्रीपट आपल्यासमोर नजर होतो. परत एकदा सर्वात ऊंचावर असलेल्या कळसुबाईंच्या ठाण्यापासुन उजवीकडे,छोटा कळसुबाई,श्रीक़िरडा,अलंग,घन्चक्कर,रतनगड अन् खूँटा,कात्राबाई,आजोबा ह्या महारथींची भलीमोठी रांग खुणावत जाते. पुढ्यात असतो मदनगडाचा खडा डोंगर,सरळ सोट आकाशात घुसलेला अन् त्याच्या पायथ्यापासून सरपटणारी सकाळची जीवघेणी अवघड अन् अनगड वाट ! पश्चिमेस अपरान्ताची पोकळी अन् त्याच्याअलीकडे घाटघर जलाशयाजवळील घाटाचा शेवटचा माथा ! किती उंचावर आलोय ना आपण ! महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखरही बरोबरीचं वाटू लागतं. गड फेरी आटोपून आपला परतीचा प्रवास सुरू होतो.

अविस्मरणीय ! हा एकच शब्द इथे सार्थ होतो. तसं पाहिलं तर अलंग- मदन - कुलंग या सह्याद्रीमधल्या सर्वात दुर्गम आणि अवघड किल्ल्यावर पर्यटकांची सोडाच पण गिर्यारोहकांची म्हणावी तेवढी वर्दळ कमीच. त्यामुळे चंगळवादी प्रव्रुत्तिपासुन हा त्यातल्या त्यात सुरक्षित,पण दुर्गमतेमुळं तेवढाच दुर्लक्षितही ! इथे मुक्कामाला प्रसन्न गुहा आहेत,पण इथंपर्यंत घेउन येणाऱ्या वाटा मात्र अनगड अन् अवघड !  या त्रिकुटाला भीडायचं असेल तर प्रस्तरारोहणची थोडीफार जाण आवश्यक आहे. बाकी हे सगळे सोपस्कार उरकून जेव्हा तुम्ही या त्रिकुटावर पाय ठेवता,तेव्हा आभाळही ठेंगण झालेलं असतं. आकाशाला गवसणी घालणारे उंचच उंच अन् अजस्र गिरिशिखरे,काळजाचा ठोका चुकवणारे अभेद्य सह्यकडे,जीवघेणी दऱ्या- खोऱ्याची भीषणता हे सगळं सगळं इथे अनुभवता येतं. एव्हाना कुलंग च्या पायऱ्यां उतरून आम्ही खालच्या पदराला लागलो होतो. हा एवढा मोठा डोंगर उतरून खालचं कुरुंगवाडी गाठायचं हेच आता या डोंगरयात्रेतलं अंतिम आव्हान होतं. कुठे घसरगुंडी,कूठे बांबूच्या झाडोरा असे करत करत पदर- दर पदर आम्ही एकदम खालच्या ओढ्याजवळ येऊन पोहोचलो. अ-म -कु चा अजुन एक भव्य नजारा डोळ्यांना सूख देऊन गेला. इथेच मदनगडाच्या खिंडीतून येणारी जुनी वाट येऊन मिळते. गावकरी अन् त्यांची पिल्लाळ आजुबाजुला सरपण गोळा करताना दिसली तेव्हा गाव जवळ आल्याची खात्री पटली. शेवटचा पदर उतरून डांबरी रस्त्यावर आलो तेव्हा या दुर्गत्रयीला मनोमन नमस्कार करून घेतला. आमचे ड्राइवर काका अन् सपोर्ट टीम बस घेऊन आधीच येऊन थांबले होते. आंबेवाडीत पोहोचुन लखनच्या पडवीत डाळ- भातावर आडवा घेत,बस मध्ये आडवे झालो तेव्हा घड्याळजी संध्याकाळच्या 4 च्या ठोक्यावर येऊन थांबले होते.

2 comments:

  1. Mastach sandy....blog vachlyavar punha to diwas jashyacha tasa dolyansamor ubha rahila....khup chan lihtos tu....

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences