भटकंती दुर्ग त्रिकुटांची : अलंग -मदन-कुलंग

2 comments:
ब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या "१९ डिसेंबर २०१४" या अंकात प्रकाशित झालेला आहे ,
त्याची epaper -link :  लोकप्रभा अंक -१९ डिसेंबर २०१४  पान क्र. ६८ च्या पुढे ……


लिंगाण्याच्या माथ्यावर - एक अचाट वेड,एक बेभान साहस !!

1 comment:

ब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या "२ मे २०१४" या अंकात प्रकाशित झालेला आहे ,
त्याची epaper -link :  लोकप्रभा अंक -२ मे २०१४  पान क्र. ७१ च्या पुढे ……



स्वर्गीय राजमार्ग - जुन्नर दरवाजा !

9 comments:
हरीश्चंद्रगड ! टोलार खिंडीतून गडाच्या नैसर्गिक अन् अभेद्य अशा सात - आठ डोंगरी भिंतीतला एक भला मोठा डोंगर चढून उतरलो की, डाव्या बाजूला माथ्यावर औरस - चौरस असा बालेकिल्ला नेहमीच खुणावत असतो. "हा बालेकिल्ला" असं जुजबी स्थलनिर्देश हरिश्चंद्रगडाच्या या वाट्याला आलेलं आहे. कित्येक वेळा गडाची ही वाट जवळ केली पण "हा बालेकिल्ला" ह्याच्या पलीकडे कधी जाणं झालं नाही. त्याची तटबंदी नेहमीच साद घालायची. कधीतरी त्यावरील भगवा डौलात फडफडायचा,म्हणायचा "इकडे पण वळु देत,तुमची पावलं ! कधीतरी". पुढच्या वेळेस आलो की बालेकिल्ला बघून येऊच,स्फुरण चढायचं पण तो योग जुळून यायला तब्बल चार वर्षे वाट पहावी लागली. आणि चांगल्या गोष्टींसाठी वाट पाहिलेली बरीच,नाही का ? असो,तर प्रवास सुरू होतो आमच्या खुप दिवसांपासूनच्या रखडलेल्या मोहीम जुन्नर दरवाज्याचा. अनायासे बालेकिल्ला पण खिशात पडणार या विचाराने सकाळी सकाळी शिवाजीनगरला राजुरच्या बस मध्ये पार्श्वभाग टेकवला,तेव्हा हाडांना झोंबणारी पौषाची थंडी मी म्हणत होती. "सॅन्डया,गारठला काय ?",असे म्हणत नाशिक फाट्यावर प्रसाद अन् योगिने आणि आळे फाट्यावर ईश्वर काकांनी गाडीत एंट्री मारली तेव्हा खऱ्या अर्थाने "येस्टी"चा प्रवास सुरू झाला. गाडीत बसल्या बसल्या खिरेश्वरच्या वाटेवरून पाचनईला घसरलो. सर्वात सोप्या वाटेने चढुन, सर्वात दुर्गम अशा जुन्नर दरवाज्याने उतरायचं ठरलं. अजून एक म्हणजे,सोपी - सोपी म्हणत राहिलेली पाचनईची वाटही उलगडणार म्हटल्यावर सोनेपे सुहागा !

राजूरात पाचनईला जाणाऱ्या वाहनांची मारामार,पण एक जण एका "हरियाली"त तयार झाला आणि एकदाचं आम्ही गडाच्या पायथ्याशी धडकलो तेव्हा दुपारचे तीन झालेले. उन्ह असली तरी गारवाही कमी नव्हता. घरून आणलेल्या शिदोरीवर ताव मारून झाला आणि गडाकडे रवाना झालो. पाचनई हे डोंगराच्या कुशीतलं छोटसं गाव, कोंकणकड्यावरील आमचा मैतर,भास्कररावांचा गाव ! बऱ्यापैकी उंचीवर असल्याने इकडुन गडाची वाट कमालीची कमी झालीये, गावात वस्ती बादड/बदाद आणि भार्मल यांचीच जास्त ! गावाच्या दक्षिणेला हरिश्चंद्रगडाचा डोंगर तर उत्तरेला पाबरगड- घनचक्कर ची चक्कर आणणारी अफाट डोंगररांग. पल्याड भैरोबा खुणावत असतो अन् पुढ्यात दिसतो तो कलाडगड,आपल्या समोरील छोट्या सुळक्यासोबत निवांत गप्पा हाणत बसलेला.एव्हाना वाकडी सुळक्याच्या पलीकडे कात्राबाईच्या खिंडीनेही दर्शन दिलेलं असतं. आस्ते कदम करीत निघालोय. छोटं टेकाड चढुन लहानस्या सपाटीवर पोहोचतो,उजव्या बाजुला मंगळगंगेची दरी अन् डाव्या बाजुला एखादा अलगद आणुन ठेवल्यासारखा एक भलामोठा कातळ, त्यामधील मोठ- मोठ्या कपारी विसाव्यास उत्तम. हाताशी असता वेळ तर दिली असती ताणुन !  येथूनच पहिल्यांदा कलाडमागे लपलेल्या आजोबांनी दर्शन दिलं आणि कृत्याकृत्य झालो. तिथेच गारगार लिंबूपाणी गट्टम करून चालते झालो तोच मंगळगंगेचा (मळगंगा) पाट आडवा आला. आता कोरडा पडलेला पाट,पावसात तुडुंब भरून वाहत असेल यात वादच नाही. पण प्रवाहामुळं आकाराला आलेल्या कातळ-तळ्याजवळ निवांत क्लिक्क्लिकाट झाला. पलीकडील दरीत चांगला दहा - एक फूटाचा फॉल, पावसातल्या फोटोग्राफिसाठी मस्त वाव होता. परत एकदा श्रावणातल्या सरीत ही वाट जवळ करायलाच पाहिजे. डोक्यात येऊन गेलेला उगाच आपला एक पावसाळी प्लॅन ! अजुन एक टेकाड चढुन माथ्यावर पोहोचलो तेव्हा दिवाकरराव आपला दिवसभराचा कार्यभाग आटोपतं घेत होते. हरिश्चंद्रेश्वरावरील भगवा,नारायणाची कलती उन्हे पिऊन जोमात फडफडत होता. डाव्या बाजुला बालेकिल्ला खुणावुन गेला.

पाचनई च्या वाटेवरून कलाडगड,रतनगड ,खुटा आणि घनचक्कर डोंगररांग

साद सह्यसागराची....भरतगड,विजयदुर्ग

No comments:
साद सह्यसागराची....निवती,सिंधुदुर्ग !  येथुन पुढे ……
तारकर्लीची पांढरी वाळू चांगलीच मानवलेली दिसत होती, कारण रात्रीची गार- गार वाळूला टेकवलेली पाठ घेऊन रिसोर्ट मध्ये येऊन झोपलो ते सकाळीच जाग आली तेव्हा प्रसाद अन् के माझ्या वाढलेल्या दाढीवर फोटोशूट करत होते. कुणाचं काय तर किसका कुछ ! आवरुन निघालो थेट रॉक गार्डन. मसुरे रस्त्याला शिवकालीन रामेश्वराचे दर्शन घेऊन सकाळचा नाश्ता आटोपून घेतला,वहिनी साहेबांचा कोंकणी धीरड्यांचा बेत राहूनच गेला होता. वडाप्पावर ताव मारून पुढच्या प्रवासाला लागलो. दुतर्फा हापसांनी लगडलेली आमराई पाहून मोह आवरला नाही,बाकी मसुऱ्याच्या अमराई ह्या प्रसिध्दच आहेत. गाडीतुन उतरून आम्ही आंब्याची झाडं न्याहळीत उभे होतो,एकेका झाडाला हजारोंनी आंबा ! कुणीतरी त्यात विचारलं,आपण तोडू शकतो का ? त्यावर कुणाची तरी कॉमेंट,हम्म !! आपल्या बापसाचंच आहे ना !  फणस पण लगडलेत,कसले भारी ! हे आमचं चर्चासत्र चालु असताना,एका मावशीने आम्हाला हटकलं,"तुका हापूस हवाय ?" अंगावर टिपिकल कोंकणी पेहेराव अन् मुखात रसाळ कोंकणी ! हो,आम्ही. "ये बाबु येका सावंतांकड घेऊन जा",असे म्हणत मागून येऊन बाजूलाच उभ्या असलेल्या ऑटोवाल्याला आमच्या दिमतिला दिलं. अहो मावशी फणस मिळेल का ?,आमच्या वहिनीसाहेब. फणसो !,यंदा फणसो आलाच नाsssय! मावशीसोबतचा हा गोड संवाद उरकून बाबुला फॉलो करत सावंतांच्या घरी पोहोचलो. सावंतांचं पारंपरिक कोंकणी घर आणि पडवीत आंब्याची रास,पैकी खास एका बंद खोलीत. देवगड हापूस हवाय,आमचा कार्यभाग ! अहो,इथली सगळी फळं म्हणजे देवगडच. किती पाहिजे ?,सावंतांची मुलं आम्हाला खोली जवळ घेउन गेली. काही तयार,काही कच्चे अशी करत प्रत्येकाने दोन - दोन,तीन - तीन या हिशोबाने पेट्या भरल्या अन् गाडीची बाल्कनी गच्च करून टाकली. खरेदी करून झाली,खाऊन झाली अन् सावंतांचा निरोप घेऊन आम्ही मसूऱ्याच्या उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा दुर्गलेण्याकडे मोर्चा वळवला. अर्थातच सावंतफोंडाचा किल्ले भरतगड ! गाड्या थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जातात. पंधरा - वीस पायऱ्या चढलो की किल्ल्यात प्रवेश. आत पोहोचल्या पोहोचल्या अवाक झालो,कारण किल्ल्याच्या आवारात हापूस आंब्यानी लगडलेली झाडं किल्ल्याचा सगळा परिसर झाकोळून होती ! ह्या असा हात वर केला की हातात आंबा. चांगली तोंड रंगेपर्यंत,मनगटांवर ओहोळ उमटेस्तोवर पोटभरून चापली. किल्ल्याच्या आतली ही आमराई खासगी मालमत्ता असली तरी,तिथल्या माणसांनी आम्हाला हटकलं नाही,हे विशेष !