सह्याद्रीमस्तक साल्हेर - पूर्वार्ध

11 comments:
बागलाण मोहीम २०१५…. हरगडाच्या आत्मकथनापासुन पुढे
दोन वर्षाआधी भरपावसात केलेली साल्हेरची वारी जशीच्या तशी डोळ्यांसमोर आहे. कोसळणाऱ्या सरींची गाज आणि सुंसुं करत वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज अजूनही तेवढाच ताजा,अगदी कालच इथून गेल्यासारखा. पण त्याच पावसामुळे अर्धवट झालेली गडफेरी आणि तेव्हाचा राहून गेलेला सालोटा मनात घर करून होता. हरगडही चुकला होता. बागलाणात पुन्हा एकदा भटकायला ही दोन कारणं पुरेशी होती. सह्यमित्रांची जुळवाजुळव करून पावले नाशकाकडे वळवलीच. त्याच भटकंतीचा आजचा दुसरा दिवस उजाडला तो पहाटेच्या पडलेल्या दवाने. स्वच्छ आकाशाची अपेक्षा असताना पहाटेचं मळभ अस्वस्थ करीत होतं. आता पाऊस बरसतो की काय अशी भीती वाटून गेली. कालचं दिवसभराचं हरगडपुराण ऐकून मुल्हेरमाचीवर आमचा मुक्काम पडला होता.गर्द वनराईत तलावाकाठी वसलेल्या माचीवरल्या ऐतिहासिक गणेश मंदिरातला मुक्काम आणि हवाहवासा गारठा, दिवसभराचा सारा शीणच निघुन गेला. पहाटे पहाटे बिनदुधाच्या कोऱ्या-करकरीत चहात लिंबू पिळून घशाला शेक दिला आणि पायगाडी सुरु केली.
माची उतरतोय तसं आकाश निवळायला लागलं. पाऊण तासात मुल्हेरवाडी गाठून वाघांबेच्या रस्त्याला लागलो. बागलाणातलं एक उपेक्षित दुर्गरत्न सर झाल्याचं समाधान वाटत होतं, त्यात जिपड्यात लावलेल्या टिपिकल नाइनटीजच्या गाण्यांनी तर तोंडावर पाणी न मारता एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. जीपची बाल्कनी आमच्या सॅकनी गच्च झालेली अन् त्यातच थोड्याफार जागेत आमची  चौकडी एकदम फिट बसली होती. हरणबारीच्या डाव्या बाजूने गेलेला निवांत रस्ता आणि बहुदा पहाटेची राहिलेली थकबाकी गोळा करत पुढ्यात बसलेला रोहन केव्हाच गारद झाला होता. पण त्याच्या दुर्दैवाने  वाघांबेचा रस्ता काही लांब नव्हता. जिपड्यातून उतरलो तर गावकऱ्याच्या प्रश्नांचा भडीमार सुरु झालेला. दोन वर्षापूर्वीच्या पावसाळी आठवांना उजाळा मिळाला. सर्वदूर पसरलेल्या हिरवाईत, वरून टपोऱ्या थेंबांचे तडाखे सोसत आम्ही खिंडीकडची जवळ केलेली वाट आणि धुक्यात हरवलेले साल्हेर-सालोट्याचे गडमाथे आठवून गेले.यावेळेला मात्र गावातूनच त्यांचं स्पष्ट दर्शन झालं. खल्लास ! आकाशास भिडलेले दोन्ही गडमाथे पुढच्याच क्षणी काळजास भिडले.


हरगड उवाच !

9 comments:

हरगड बोलतो तेव्हा … या नावाने,साप्ताहिक लोकप्रभा दि. २५ डिसेंबर २०१५ या अंकात पूर्वप्रकाशित लेख (वाचण्यासाठी इथे click करा , पान क्र७० च्या पुढे …)

बागलाण ! या चार अक्षरातच नाशिक जिल्ह्याच्या या भुभागाचा इतिहास डोळ्यांसमोरुन तरळून जातो. काही काही शब्दात एक विशिष्ट जादू असते. तो शब्द उच्चारला की इतिहास-भूगोलासोबत त्याचा वर्तमानही खुणावत जातो. इथले डोंगर जेवढे ऊंच,तेवढाच या मातीचा इतिहास  गगनाला भिडलेला. किंबहुना त्याहीपेक्षा उंच. जेवढा तुम्ही वाचलेला,तुमच्या माहितीतला,कुणी तुम्हाला सांगितलेला,तुम्ही ऐकलेला,त्याहीपेक्षा जास्त वास्तविक मी अनुभवलेला. खरं तर माझ्यापेक्षा तो कुणाला माहितही नसणार. नसणारच मुळी. इथे नांदलेल्या राजवटींपेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे झेललेला, आणि इथल्या मोठ्या मोठ्या राजकीय संक्रमणाचा साक्षीदार मी ! इथल्या रक्तपाताचा,इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा,कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोट्यानंतर सर्वात उंच डोंगर मी, प्रसिद्धी मात्र माझ्या वाट्याला त्याच्याइतकी नाही. हा एकटेपणा फार भयंकर असतो.या एकटेपणातच पिचलेल्या महाराष्ट्रदेशातील अश्या कित्येक गिरीदुर्गांपैकी एक मी. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकट्या भावांची साथ असली तरी इकडे वळलेली मानवी पावलं  दुर्मिळच. असो, ही माझ्यासाठी रोजचीच व्यथा. पण आज मला बोलायचंय,हा अबोलपणा सोडायचाय.कोणी ऐकेल का ? पण त्यासाठी तुम्हाला तुमची वाट थोडी वाकडी करावी लागेल, माझ्या थोडं जवळ यावं लागेल. चला येताय ना मग ! 


मंगळावरील चोर !

12 comments:

सोनकी अन् तेरड्याने सजलेला रस्त्याचा दुतर्फा आणि हिरवा शालू नेसलेला परिसर अनुभवत आमची तुकडी दुर्गाडीच्या वेशीवर पोहोचली, तेव्हा गावातलं एकेक बारदाण आमच्याभोवती गोळा व्हायला सुरवात झाली होती. कारण आमच्याकडून फार्सच तसा पडला होता. आमच्या तोंडून “चोरकणा” हे चार शब्द ऐकल्याबरोबर अख्खं  गाव आमच्याकडे चोर असल्यासारखं “अबाबा!” असं करीत विचारपूस करून जात होतं. गावात नेहमीची कामं, धूणीभांडी इत्यादींने गजबजला होता. अर्ध्या चड्डीवर किरटी पोरं हुंदळत होती. मध्यान्हीचं उन्हं  माथ्यावर आलं होतं. वाटाडया शोधायला म्हणून गेलेला प्रसाद अजुन परतलेला नव्हता. एकंदरीत आज चोरवाटेला लागण्याचे संकेत धूसर दिसत होते.
बऱ्याच वेळाने प्रसाद परतला तो वयाच्या साठीवर आलेल्या एका तरुणाला घेऊन. अपेक्षेप्रमाणे पिकलं पानंच कामाला आलं होतं. कारण चोरकणा हे ऐकूनच गावकरी आम्हाला परतण्याचे सल्ले देत होते. तिकडे न फिरकण्याची कारणंही भरपूर कानावर पडत होती. कमरेएवढं गवत अन् जनावरांची दहशत मनावर एवढी बिंबवली जात होती की चोरकण्याचा नाद सोडून वाघजाईने उतरावे लागेल की काय, अशी भीती वाटायला लागली. मात्र “चंदर पोळ” नावाच्या साठीवर आलेल्या तरुणाने आमच्या हातात काठ्या टेकवल्या अन् धारेपर्यंत सोडण्याचे कबूल करून चोरवाटेला लागलो तेव्हा दुपारचे दिड झाले होते.

दुर्गाडीच्या सोंडेवरून  नीरा - देवघर 

अंधारबन-गाढवलोट-खडसांबळे : लेण्यांच्या शोधात

1 comment:
पुर्वप्रकाशित लेख 'सह्याद्रील्या कुशीतली भटकंती' - लोकप्रभा अंक : ४ सप्टेंबर २०१५,पान क्र . ६९ च्या पुढे 
गेल्या आठवड्यातच अंधारबनला जाऊन आलो. पुण्याच्या अगदी जवळ पाठमोऱ्या ताम्हिणी घाटाजवळ वसलेल्या दाट जंगलात मनमुराद भटकंती अनुभवली. आतापर्यंत आडवाटेवरचा मानल्या गेलेला सह्याद्रीच्या धारेवरच्या पायगाडीचा हा प्रवास पुन्हा एकदा मनात घर करुन गेला. या प्रवासातले प्रवासी मात्र सगळ्या प्रकारात मोडणारे ! अगदी नेहमीच्या भटक्या मित्रांपासुन चिमुकल्या सह्यमित्रांपर्यंत पाच-एक डझनाचा गट घेऊन अंधारबन ते कोंकणातल्या भिरा धरणापर्यंतची वर्षासहल जोरात पार पडली. सुरवातीस पाऊस उदार होता पण नंतर मात्र त्याने जी काय पळी दिली ती ट्रेक संपला तरीही तो भेटलाच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाटेत काडीचाही केर न करता,आरडाओरड न करता जवळपास १४ किमीचा ट्रेक यशस्वी झाला. अजुन एक, विशेष अभिनंदन प्रसादचं ! स्टोक कांगरी शिखर सर करुन आदल्या रात्रीच लेहवरून पुण्यात पोहोचलेला हा पठ्ठया अंधारबनचा ट्रेक लिड करायला सकाळीच हजर होता. क्या बात !! पहाटे पुण्यातून निघालेल्या गाड्या पिंप्रीच्या पाझर तलावाजवळ पोहोचल्या पोहोचल्याच योगीला विचारलेल्या प्रश्नाने आमचा अंधारबन ते खडसांबळ्याचा ट्रेक डोळ्यांसमोर तरळून गेला. काय योगी ? आठवतो का चना मसाला ? "हो ना, त्या खोपट्याजवळच पेटवली होती चुल", तीही वदली. बाकी तंगडतोड भारीच झाली होती म्हणा. आणि हो,अशा ट्रेकमध्येच भटकण्याची खरी मज्जा,घाटवाटा म्हटल्या की आमचा हा फार मोठा वीकपॉइंट बरं का !


रुसलेल्या पावसात .. सैर घाटवाटांची !

15 comments:
उकाडा जाणवतोय फार. उंबरठा ओलांडून घराबाहेर पडावं तर दिवाकरराव सकाळी सकाळीच सुरू होतात. स्वच्छ सूर्यप्रकाश पण डोळ्यांना असह्य होणारा,आता नकोसा झालाय. वर निळ्या आकाशी एखाद कापशी ढग वरुणराजाची आठवण देऊन जातोय. कधी येतोय रे पावसा, अश्या विनवण्या करीत मुके जीवही झाडांच्या सावलीत विसावतायेत. आम्हा भटक्यांच्या भटकंतीलाही  जरा विराम लागलाय. पण त्याही परिस्थितीत मन काही रमेना. मग डोक्यात मस्त प्लॅन शिजायला लागतो, घनदाट अरण्याची वाट खूणावते. मन सैरावैरा धावू लागतं वाट अंधारबनाची. मग मजाच मजा बाहेर आग ओकणाऱ्या दिवाकराला वाकुल्या दाखवत सह्याद्रीच्या कुशीत शिरण्याची. मग त्याला उगाच चिडवत भटकत राहण्याची,तुला काय वाटलं ? आम्ही घरात बसणार ? नाहीरे, नारायणा नाही. तुझ्या नाकावर टीचुन डोंगरात जाणार.
मढे घाटाचा धबधबा

खडा सह्याद्री !

12 comments:

ब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या "12 जुन 2015" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ जुन २०१५ पान क्र. ७० च्या पुढे(click here)  
 
(ट्रेक : अस्वलखिंड - कामथा घाट - महादेव मुरा - ढवळे - ढवळे घाट - मढीमहाल)