मावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण(नाणदांड घाट - सुधागड)

मावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण - भाग १
Continued from last part.....



© Sandip Wadaskar
पहिल्या दिवसाचं तीन किल्ल्यांचं लक्ष्य साध्य झालं होतं. एकोल्याचा घनगड सर झाला तेव्हा सुर्य नारायण वेगाने मावळतीकडे झुकत होते. वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. गावातल्या विहिरीवरच्या पाण्यानी बाटल्या भरल्या आणि केवणी पठाराकडे चालायला लागलो. राहिलं होतं आजचं शेवटचं आव्हान, केवणीचा माथा गाठायचा ! 

© Sandip Wadaskar
वाट सरळ सरळ धोपटच आहे. जसजसं पुढे जातो तसा वातावरणाचा रंगच बदलत होता. शहराच्या गराड्यात नं दिसणारं नारायणाचं गोमटं रूप आणि हवाहवासा गारवा मन सुखावून गेला. पाठीराख्या घनगडावर सांजवेळची सोनेरी किरणे पडून नटल्यासारखा दिमाखात उभा होता. कदाचित निरोप घेत थांबलेला असावा. "मावळं,यावं परत भेटीला",असंच काहीतरी बोलत होता. उजव्या बाजूला तैलबैल पठारावर अजस्त्र कातळाच्या जुळ्या भिंती खुणावत होत्या. दिवाकर रावांची अपरान्तात वेगाने वाटचाल सुरु होती,पण त्याचे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवुन घेण्यास आमचा वेग मंदावला होता. पुढ्यात भोरपगड जय्यत तयारीनिशी आमच्या स्वागतासाठी उत्सुक असल्यासारखा भासत होता आणि दूरवर अस्पष्ट सुधागड आणि तैलबैल पठाराच्या दरीपलीकडे सरसगड आपलं अस्तिव जाणवत होता. ह्या अशा कातरवेळी हे सह्यकडे बोलु लागतात,रानपाखरांचा चिवचिवाट कर्णेंद्रिय तृप्त करून जातात,कुठेतरी पराकोटीच्या शिस्तीने उडणारा पक्ष्यांचा थवा तुम्हाला टीमवर्क शिकवतो,याच टीमवर्कने प्रेरित होऊन आम्हा भटक्यांची पावले केवणी पठाराकडे पडत होती. गुढ शांततेत अखंड बुडालेला सोनेरी आसमंत न्याहाळत आम्ही एका खिंडीतून उतरायला सुरुवात केली,तेव्हा तैलबैलाच्या वेगळ्याच आणि अप्रतिम नजारयाने डोळ्याचे पारणे फिटले. जगाला दोन भिंती माहिती आहेत तैलबैलाच्या,या खिंडीतून त्या एकसंध वाटतात. पठारावर पोहोचलो तेव्हा,अंधार पडायला सुरुवात झाली होती. पठारावर मोजून तीन-चार खोपट्या. पैकी एका म्हाताऱ्या बाबांना विचारून पथाऱ्या पसरल्या आणि अंगणात मुक्काम करायचं ठरवलं. 



© Sandip Wadaskar
 सरपणाला वानवा नव्हती. तीन दगडी ठेऊन रानातला संसार थाटला. मग मोहरी-कांदा-तिखट-लसणाची पेस्ट अगदी कडीपत्ता सुद्धा, सर्र्र्र्र्र्र्र्र्र् फोडणीचा आवाज झाला ! दिवसभराच्या भटकंतीचा शीण, मस्तपैकी गरम गरम जेवायला मिळालं की कुठल्या कुठे पळतो आणि स्वतःच्या हातानी बनवलेलं असल्यामुळं जेवणसुख काय असतं हे इथे कळतं. तसंही आम्ही अशाच मुक्कामाच्या शोधात असतो. भात रटरटायला सुरुवात झाली आणि लागलीच खमंग दरवळला. भाताच्या सुगंधाने का कोण जाणे बाबांनी विचारले "काय,मसाले भात का?" चला,पावती पण मिळाली. येथेच्छ हादडून जमिनीला पाठ टेकवली तेव्हा रात्रीचे नऊ-सव्वा नऊ झाले असतील. चांगली ६ तासाची पुरेपूर झोप घेण्याची सोय होती. 

पहाटे जाग आली तेव्हा अंधारलेलच होतं. कोंबडा आरवण्याच्या जागी कुत्रे भुंकत होते. बाबांच्या झोपडीतला रेडिओ सुरु होता. पण दार बंद होतं . "बाबा,येताय ना वाट दाखवायला ?" बाबांना दोन-तीन आवाज दिले. आज आम्हाला कोंकणात उतरायचं होतं. नाणदांड घाटाची खिंडीपर्यंतची वाट अंधारात दिसली नसती. मावशीबायला थोडे पैसे देऊन आमची दुसऱ्या दिवसाची वाटचाल सुरु झाली. १०-१५ मिनिटे चालल्यानंतर आम्ही सह्यधारेवर येऊन थांबलो ,खिंडीकडे बोट दाखवुन बाबांनी उतरण्याची वाट दाखवली. ती बघुन थोडसं चर्रर्र झालं,तीव्र उतार असलेली वाट सरळ खाली उतरत होती. अंधारामुळं नेमकी स्पष्ट होत नव्हती. बाबांचा निरोप घेतला. झुंजूमुंजू व्हायला सुरवात झाली आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. वाट दगडाच्या पालापाचोळ्याने झाकोळली गेली होती. तो बाजूला सारून उतरावं लागत होतं कारण तसं नाही केलं तर पार्श्वभाग जमिनीला टेकलाच समजा! बऱ्यापैकी उजाडल्यावर समोरचं दृश्य निखळ व्हायला लागलेलं. तैल्बैलाच्या भिंती सह्यरांगेच्या आड गेलेल्या,समोर सुधागडाचं विस्तीर्ण पठार आणि पठाराच्या दक्षिणेस सवाष्णीच्या खोरयात सरळ तुटलेला भव्य कडा! होय हेच ते सुधागडावरील टकमक टोक आणि त्यामागे भक्कम पातशहा बुरुज. 

© Sandip Wadaskar
सवाष्णीच्या पात्रात उतरलो तेव्हा सकाळची कोवळं उन्हं पडली होती. पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणारे नदीचे पात्र उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोरडे पडले होते. मागे सह्याधारेच्या पोटातच आम्ही नुकताच उतरलेल्या घाटवाटेचा अंदाज लावत होतो. उजव्या बाजूला गोल बुरुजासारखे दोन कातळ लक्ष वेधुन घेत होते.वृक्षराजीने कात टाकल्यासारखं सगळीकडे फट्ट पडलं होता. पावसाच्या सरींना आसुसलेली ही वनश्री आकाशाकडे चित्त स्थिरावल्यासारखी दिसत होती. मघापासुन सह्यआड झालेल्या तैलाबैलाच्या सुळक्यांनी पुन्हा एकदा दर्शन दिले. समोरच्या सुधागडाच्या छातीवर वाळलेली गवताची कुरणे सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे चकाकून निघाली होती. वातावरणात एक विलक्षण शांतता होती. पण मन मात्र येथे घडलेल्या इतिहासाची पाने चाळण्यात रमलं होतं. पाच्छापुरच्या याच परिसरात स्वराज्याच्या खलबती झाल्या असतील नाही ? इथेच कुठेतरी शहजादा अकबराचा(दिल्लीश्वर औरंगजेबाचा मुलगा) तंबू पडला असेल,संभाजी महाराजांच्या भेटीला! स्वराज्याच्या सुवर्णकाळात शिलेदारांच्या घोड्याच्या टापांनी हा परिसर दणाणुन गेला असेल नाही ?,विचार करतच ओढ्यावर थोडं चाबुक डुबुक करून ठाकरवाडीकडे निघालो. 

© Sandip Wadaskar
ऐन उन्हाळ्याचे दिवस आणि वरून समुद्र जवळ असल्यामुळे दमट. घामाने निथळत ठाकरवाडीचा रस्ता कमी करत होतो. भूकेमूळ पोटात कावळे ओरडायला सुरुवात झालेली. वीस मिनिटात ठाकरवाडीचा माथा गाठला. दुर्दैवाने गावात खाण्यापिण्याची सोय नाहीये. त्यामुळे जवळ असलेल्या बिस्किटांवर भागवण्याशिवाय पर्याय नव्हता. गड चढायला सुरुवात केली तेव्हा परिसर धुक्याची चादर पांघरून होता. ठाकरवाडी या आदिवासी पाड्यात सकाळची लगबग चाललेली.चढाईच्या पहिल्या दमातच घामाच्या धारा वाहु लागल्या. सुधागड उर्फ भोरपगड! काय वर्णावे या कोंकणसख्या बद्दल? काय आणि किती लिहावे ? महाराजांना हा गड राजधानी करायचा विचार जसा आला असेल, तसाच या किल्ल्यानी पहिल्याच भेटीत मला भुरळ पाडली होती. ब्लॉग लिहेपर्यंत जरी तीन खेपा झाल्या असतील,तरी सुधागडाची ही माझी दुसरी खेप. सुधागडाच्याच अंग खांद्यावरील सौंदर्याने माझे भटकण्याचे रुपांतर हे नियमित भटकंतीत झाले. कॉलेज संपल्यानंतर तब्बल ३ वर्षांनी प्रसादशी आणि केसागरची भेट सुद्धा सुधागडच्याच  पहिल्या ट्रेक ला झाली. खोपोलीच्या बस स्टन्डवर दोन-अडीच तास आमची (वसु,रीश्या आणि मी) वाट पाहत थांबलेला केसागर आठवला की, अजूनही हसु आवरत नाही. आमच्याशी असं जिव्हाळ्याचं नातं जपणारा सुधागड आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात घर करुन बसलाय. त्यामुळे इथे कधीही यावं. पावसाळ्यात यावं,उन्हाळ्यात यावं, सुखद आठवणींचा खजिना अगदी मोकळ्या हातानी बहाल करीत असतो.


  
पहिल्या दमात आम्ही शिडी जवळच्या पठारावर पोहोचलो. ही नवीन लोखंडी शिडी ट्रेकक्षितीज संस्थेनी बसवली आहे. त्यामुळे चढाई अजुन सोपी झालीये. पायथ्यापासून या शिडीचा आकार हा  जीराफच्या लांबलचक मानेसारखा दिसतो. झाडी ओसाड वाळलेली असली तरी उन्हाळी लाल फुलांनी नजाऱ्याला चांगलाच न्याय मिळवुन दिला होता. सुधागडाचे हे रुप पावसाळ्यात पार पालटून गेलेलं असतं. पावसाळ्यात हा भोरप डोंगर हिरवा रेनकोट घालुन मस्तवाल पैकी उभा असतो. आणि पावसानंतर तर पाहायलाच नको, हिरवी शाल पांघरलेला सुधागड सोनकी,तेरडा इत्यादी फुलांमुळे तर अधिकच सुंदर दिसतो. हे देखणं रूप सुधागडाचच नव्हे तर पूर्ण सह्याद्री रांगेचं असतं. शिडी वाट चढून आपण दरवाज्याजवळ पोहोचतो. उजव्या बाजूचा बुरुज नव्हे नैसर्गिक कातळाला तासुन सुंदर,सुबक,अभेद्य असा कातळकडाच! आणि ताशीव काम तर अफलातूनच! तसेच डाव्या बाजूचे कडे सुद्धा तासून बेलाग बनवलेले. गडावर जाण्यासाठी या भागातला रस्ता म्हणजेच हा पाच्छापूर दरवाजा. "शिवरायांचे दुर्गविज्ञान म्हणजे काय?" याची आपल्याला येथे आल्याशिवाय नाही कळणार. बुरुजावरच दगडी बांधकाम केलाय,ही त्याची तटबंदी आणि त्यातच पहारेकऱ्यांची टेहेळनिची जागा,कदाचित येथुन शत्रुसैन्यावर मारा करीत असावे. आत जाणाऱ्या पायऱ्यांवर नक्षीकाम केलेले आढळते. मध्येच छताला चिकटलेल्या पाली भीती दाखवतात. आणि त्या पाली आकारानी एवढ्या मोठ्या आहेत की असं वाटतं "शिवकाळापासून त्या इथेच वास्तव्याला आहेत आणि जागेची दुर्गमता टिकवुन आहेत." येथूनच पुढे गेल्यावर छोटाश्या पठारावरून पुन्हा एकदा टकमक टोक लक्ष वेधुन घेतो. वीस मिनिटात आपण माथ्यावर पोहोचतो आणि सरकारवाडा वा सदरेची जागा दृष्टीस पडते. आता फक्त दगडी अवशेष उरलेले आहेत. 




© Sandip Wadaskar
सुधागडाचं विस्तीर्ण पठार,मुख्य सह्यारांगेपासून वेगळा असलेला सुटा डोंगर,देश आणि कोंकण यांच्या अगदी सीमेवर असलेला,येथुन समुद्र पण जवळ! कदाचित याच भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे महाराजांना ही राजधानीची जागा करावीशी वाटली असावी. सदरेपासून निघालो की पडक्या वाड्यांचे अवशेष पाहत आपण पंत सचिवांच्या वाड्यात शिरतो. भोरचे संस्थानिक यांचा हा भव्य वाडा ब्रिटीशकालीन इतिहासाची आठवण करून देतो. वाड्यात ट्रेक्षितीज संस्थेने गडा संबंधी माहितीफलक लावलेले आहेत.वाड्यातले ऐसपैस ओटे शेणाने सारवलेले आढळतात. या परिसरातच कातळात खोदलेली पाण्याची तीन मोठी टाकी आहेत. आम्ही गेलो तेव्हा संस्थेचे कार्यकर्ते टाक्याची साफसफाई करत होते.वाड्याच्या मागल्या बाजूस महादेवाचे मंदिर आणि आत सुरेख शिवलिंग आढळते. त्याच्याच बाजूला चोर दरवाज्याचं बुजलेलं बांधकाम गत इतिहासाची आठवण करून देतो.भोराई देवीच्या मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला दाट झाडीतुन वाट काढीत खाली उतरलं की गार पाण्याचं छोटसं टाकं आणि उजव्या बाजूला तटबंदीची भिंत लक्ष वेधुन घेतात. तसंच आपण पायऱ्या उतरून गेलं की गुहेत शिरतो. गुहेतल्या पायऱ्या उतरलो की छोटाश्या चौकोनी दगडी बिळातून बाहेर पडतो न पडतो तोच थक्कं करणारं दुर्गविज्ञान आपल्याला आपसूकच शिवशाहीत घेऊन जातं. अरे केवढा तो बुरुजाचा घेर आणि केवढी ती भक्कमता! सुधागडावरील माझी ही सर्वात आवडीची जागा. इथे आलो की त्या बुरुजाकडे नुसतं बघत बसावसं वाटतं. चोर दरवाज्याची ही दुर्गम वाट घनदाट अरण्यातुन आणि खाचखळग्यातुन  धोंडसे या गावी उतरते.थोडावेळ घालवुन आमची स्वारी निघाली भोराईदेवीच्या मंदिराकडे.मंदिराच्या आवारात पाठपिशव्या टाकुन ओझं कमी केलं. जेवणाआधीचा टकमक्यावरून तेवढा आसमंत न्याहाळायचा राहिला होता,निघालो त्या बोलक्या कड्याकडे. पठारावर टोकाकडे जाताना दोन्ही बाजूनी हिरवंगार रान आहे आणि उजव्या बाजूला धान्यकोठारासारखं बांधकाम दिसतं. जाताना तीव्र उतार असल्यामुळे सावधानता बाळगावी लागते.निमुळत्या पठारावर पोहोचलो की विहंगम दृश्य आपली वाट असतं. सुमारे सहाशे-सातशे फुटाचा सवाष्णीच्या खोरयात तुटलेला कडा ,खाली पाहिलं की डोळे गरागरा फिरायला लागतात. आणि समोर पाहिलं की अभेद्य असा सह्याद्री !





परत मंदिराजवळ आलो तेव्हा भोराई देवीच्या पुढ्यात कुणाच्या तरी अंगात आलं होतं. अंगात येण्याचा कार्यक्रम एवढ्या ऱ्हिदम मध्ये चाललेला होता की एखाद्या बॉलीवुड गाण्याला चाल पण मिळाली असती. मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगलेली घंटा ही चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यावरून आणलेली आहे, अशीच घंटा आपल्याला भीमाशंकरला पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूंचे पठार हे विरगळ आणि समाध्यांनी भरलेलं आहे. येथुन तैलबैलाचे अजुन जवळुन दर्शन होते. पोटोबा उरकुन महादारवाज्याकडे चालायला लागलो. पाण्याची तहान लागली होती,पण पुजाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे महादरवाज्याच्या पुढे एक टाकं लागणार होतं. दहा पंधरा मिनिटे दगडांची आरास करुन तयार केलेल्या पायऱ्या उतरुन आपण दोन्ही बाजूंनी कातळभिंती असलेल्या दगडी जिन्याजवळ पोहोचतो. आणि जिना उतरुन बाहेर पडण्याआधीच महाद्वाराची भव्यता लक्षात येते. नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूनी पहारेकरयांच्या देवड्या. आणि बाहेर पडतो न पडतोच रायगडाची आठवण येते. रायगडावरील महाद्वाराची हुबेहूब प्रतिकृती! तीच गोमुखी रचना,तेच कमळपुष्पं आणि तेच व्याघ्रशिल्पं! वाह !


धोंडसे गावाकडची ही वाट अगदी अलीकडच्या काळापर्यंत बंद होती. यासाठी ट्रेक्षितीज संस्थेचे आभार मानायलाच पाहिजे,कारण त्यांनीच दगडमातीत बुजलेल्या महाद्वाराची वाट मोकळी केली. आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. थोड्या वेळानी टाकं लागलं, आणि पाणी ! तर केवळ अमृततुल्य! अर्धी वाट सरून आली तेव्हा तानाजी टाक्याजवळ येऊन पोहोचलो होतो. घनदाट जंगलातुन जाणारी ही पायवाट नव्हे पूर्वीचा राजमार्गच ! पण आता दगडांच्या राशीमध्ये स्वतःची पुरती ओळख विसरून बसलाय. इथवर येईपर्यंत घुडघेरावांची दमवणूक झाली खरी पण तानाजी टाक्यातील पाण्याने चालण्यास परत हुरूप आला. 

© Sandip Wadaskar
ट्रेक हा शेवटच्या टप्प्यात असताना कधी कधी म्हणजे नेहमीच (निदान मोठ्या ट्रेकमध्ये) "हा रस्ता संपत का नाहीये ?" असं त्रासल्यासारखं वाटत राहतं आणि कधी एकदा गावात येऊन पोहोचतो असं वाटतं. पण एकदा का गावातलं छानपैकी गार गार पाणी पोटात गेलं की क्षणार्धात थकवा नाहीसा होतो आणि पुढल्या ट्रेकचे प्लान डोक्यात हजेरी देऊन जातात. असंच दगडांना वैतागुन आम्ही वैतागवाडीत शिरलो. वैतागवाडी हे वाटेवरील वस्तीचं नाव आहे. अगदी नावाला साजेसं ! उतार संपुन सपाटीला लागलो तेव्हा दातपाडीच्या(हे नदीचं नाव आहे ! "काय एक-एक नावं आहेत? वाह !") दगडी राशीत शिरलो. चालताना ,आज एखाद्याची बत्तीशी कामी येणार असं वाटायला लागलं होतं ,पण सुदैवानं तसं झाली नाही. उन्हाचे चटके झेलत,अंगावर घामाचा पुर अशा अवस्थेत आम्ही धोंडसे गावात पोहोचलो तेव्हा "येस्टिची" वेळ झालीये असं कळलं. शरीरातलं पाणी चांगलच कमी झालं होतं. पाणी गार नसल्यामुळं पेप्सी कोल्यानी आत्मा शांत केला. एसटी आली,पालीकडचा प्रवास सुरु झाला. गाडी मुख्य रस्त्याला लागली तेव्हा तैलबैल रागावून,डोळे वटारून बसल्यासारखा दिसत होता,"नाहीच ना आला तुम्ही? ". निरोप घेतला पुन्हा एकदा भेटायला !  

धन्यवाद !

7 comments:

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences