इरशाळगड-शिवाजी शिडीने माथेरान : उत्तरार्ध

© Sandip Wadaskar

इरशाळगडाच्या सुळक्याच्या दर्शनाने कृत्याकृत्य झाल्यासारखे वाटत होते. इरशाळवाडीतून ठाकुरवाडीकडे चालायला सुरुवात केली. पुढल्या वेळेला आलो तर,वाडीतल्या शाळेत मुक्काम करण्याचा बेत मनात पक्का केला. पठारावर आलो तेव्हा पावसाचा जोर कमी झाला होता. समोर गाई चरण्यास सोडुन एक म्हातारे आजोबा उभे होते अन बाजूला एक चिमुकली हुंदडत होती . "बाबा,ठाकुरवाडीची वाट कुठुन आहे ?" मी विचारलं. "वाट न्हाय !",बाबा उत्तरले. "वाट नाही !" "म्हणजे वाट हाय,पण तुमास्नी समजणार न्हाय. ढोरवाटा बी लयी हाय ." ,इति बाबा. बहुतेक बाबाला आम्ही पोरं वाट चुकण्याची भीती वाटत असावी. विश्वासात घेत आम्ही त्यांच्याकडून वाट निश्चिती करून घेतली आणि वाट शोध मोहिमेसाठी निघालो. बाबांच्या म्हणण्यानुसार एक ओढ वजा नदी लागेल आणि ओढा पार केला की लगेच ठाकूरवाडी. आमची भटकंती सुरु झाली. पठारावरून झाडीत शिरलो. पाऊस अधेमध्ये आपलं अस्तित्व जाणवत होता. पायवाट जरी मळलेली असली तरी, अधून मधुन ढोरवाटा पण भेटीला येत होत्या. त्यातल्या त्यात पायवाट शोधावी लागत होती. पावसातल्या भटकंतीचा सगळ्यात मोठी गंमत म्हणजे धोपट वाटा या सर्व हिरव्या गालीच्या खाली झाकल्या जातात आणि त्या शोधण्यात मोठी मज्जा असते. आता हीच मजा अनुभवायला इथे आलेलो!                      

© Sandip Wadaskar

चारही बाजूनी हिरवीगार गर्द झाडी. गेली चार पाच महिने उन्हाचे चटके सोशीत काढलेल्या पर्वतराजीने हिरवीगार शाल पांघरल्यासारखे भासत होते. जणु नव्या नवरीने आपल्या माहेरपणाला आल्यासारखे. पण हे माहेरपण अजुन दोन-तीन महिने चालणार होते. या कल्पनेने थोडे हसु आले आणि कारण काय तर "दोन-तीन महिने नवरा मोकाट सुटणार होता." असो! अशा या शाल पांघरलेल्या परिसरातून चिखलाची रानवाट तुडवत आम्ही चार भटके चालत होतो,निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत! फक्त निसर्ग आणि आम्ही. अधुन मधून गावकरी भेटत होते. निर्भेळ सुख आणि एकांत! मोरबे धरणाची माथेरान कडील बाजु निमुळती झालेली दिसली. थोड्याच वेळात इरशाळवाडीचा डोंगर उतरून झाला,बैलगाडीचा रस्ता सुरु झाला. आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्हाला शोधायचा होता ओढा! जास्त विचार न करता पुढे चालत गेल्या गेल्याच ओढ्याने आमची वाट अडवली. थोडाफार आलेला थकवा पार कुठल्या कुठे पळाला. आता फक्त स्वच्छ नितळ पाण्यानी अंघोळ करायची बास.

चहुबाजूनी डोंगरांच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात. डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या पाण्याने तयार झालेला नितळ ओढा. थोडं झाडीत शिरल्यावर दगडांच्या बांधावरून धोधो वाहणारे दुधासारखे तेच पाणी. आणि तयार झालेला छोटासा धबधबा. वाह ! क्या बात है ! आणि दुग्धशर्करायोग म्हणजे (दुधात साखर घातल्यासारखे बरं का!) त्या नयनरम्य जागी फक्त आम्हा चार भटक्यांची टोळी. अफलातुन वाह ! वाह ! मला एकदम गर्दीने भरलेल्या लोणावळ्याजवळील कुठलाशा एका धबधब्याची आठवण झाली. 

© Sandip Wadaskar
पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची लोणावळा-खंडाळा या ठिकाणांकडे धाव सुरु होते. अक्षरशः जत्रा भरते. या दिवसांमध्ये राकट,कणखर सह्याद्री जलप्रपातांनी न्हाऊन निघालेला असतो. रौद्र सह्यपर्वताचे हे रूप पालटलेलं असतं. निसर्गाचे हे विलोभनीय सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. अशाच लोणावळा-खंडाळा या थंड हवेच्या ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीने का होईना ? विकास चाललाय. (हा विकास चुकीच्या मार्गांनी चाललाय ,हा वादाचा मुद्दा ??) पण इथे येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. "पर्यावरणाची हानी" हा विषय हास्यावर नेणारे बरेच महाभाग पर्यटक इथे भेटतात. म्हणजे इथे यायचं,उघडे-नागडे होऊन,दारू पिऊन गोंधळ घालायचा,खाण्याची वेस्टने,दारूच्या-पाण्याच्या बाटल्या तिथेच टाकायच्या आणि वरून "आम्ही काहीतरी अचाट केलय" या आविर्भावाने घरी परतायचं. लोकांना कल्पनाच नाहीये की ही परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर होत चाललीये. असो. "लोकांना सुबुद्धी येऊ दे." हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 



धबधब्याखाली निसर्गस्नान आटोपुन फोटोसेशन चा मनमुराद आनंद लुटला. मनोरेच्या सागरने तर ३ bhk apartment असे नामकरण करून प्रत्येकास एक कोपरा वाटुन दिला. या कार्ट्याचं डोकं कुठे आणि कसं चालेल याचा नेम नाही. आणि इंद्रा हे ध्यान ,कुठलं ध्यान करत बसलेले देव जाणे! 

© Sandip Wadaskar

थोडी पोटपूजा आटोपुन ठाकूरवाडीकडे चालायला सुरुवात केली. स्वच्छ पाण्याने अंघोळ झाली होती,पोटात थोडफार गेलं होतं. पुढे चालण्यास एवढी उर्जा पुरेशी होती. अशेच दोन-तीन ओढे पार केल्यानंतर सपाटीला पोहोचलो. झाडी थोडी विरळ झाली. आणि समोर माथेरानच्या डोंगराने दर्शन दिले. माथा पूर्ण धुक्यात हरवलेला. पुढे एका दगडावर एक म्हातारे आजोबा जणू काही आमचीच वाट पाहत थांबले आहेत अशा अविर्भावात बसलेले दिसले. "बाबा,ठाकूरवाडी अजून किती लांब आहे?",इति अतुल. "हीच ठाकूरवाडी! ",इति बाबा. अरे वाह. म्हणजे आपण वाडी पर्यंत पोहोचलो तर. बाबांना केळीचे वेफर्स देऊ केले. त्यांनी ते अगदी प्रसादासारखे स्वीकारले. किती साधी-सरळ असतात नाही ही माणस? पण वाडीतले घरं आम्हाला दिसली नाहीत.बैलगाडी रस्त्याने चालत परत एका वाडीत शिरलो. भात लावणी चाललेली. वाडीचं नाव विचारलं,काय बरं नाव ? … हो पिरकडवाडी. मस्त डोंगरांच्या कुशीत वसलेली सात-आठ घरांची वाडी. भरपूर पाऊस असल्यामुळे भातातीच शेती जास्त. "जा,दादाबरोबर शिडीपर्यंत" कुणीतरी मागुन त्यांचं किरटे पोर हाकलल्यासारखी हाक दिली. मागे वळून पाहिलं तर कुणीच नव्हतं,बहुदा पोरानं बापाचं ऐकलं नसावं. असु दे. अशाच ठाकरांच्या दोन-तीन वाड्या पालथ्या घालून एका मोठ्या ओढ्याने परत आमची वाट अडवली. ओढ्याचा प्रवाह बराच. वातावरण पार निवळून गेलेलं.धुळीचे कण पावसाच्या जोरदार तडाख्याने जमिनीवर स्थिरावले होते. खूप वेळानंतरच्या भरपूर सूर्यप्रकाशाने आसमंत उजळून निघाला होता. पण माथा अजूनही धुक्याच्या कवेत शांत निजला होता. सूर्यप्रकाशाने हजेरी लावल्याने आपसूकच क्यामेरे बाहेर पडले. रस्ता विचारण्यासाठी इंद्रा आणि मी वाडीत शिरलो,परत आलो तर अतल्या आणि सागरचा पत्ता नव्हता. फोटो काढण्याच्या नादात बहुतेक हे दोघे मागेच राहिले असावे. त्यांना हाका मारून मारून हैराण. जाऊ दे. भेटतील इथेच.




 इरशाळ गडाचा उत्तुंग सुळका आमची पाठराखण करत होता. "मी आहे,तुम्ही निघा खुशाल माथ्याकडे " असं काहीतरी खुणावत होता. वाडी सोडून दाट झाडीत शिरलो,इथून आता चढण लागणार होती. डोंगराच्या पोटात परत एका धबधब्याने आमचे स्वागत केले. बाजूलाच कातळावर निवांत जागा दिसली बसायला. विचार केला, थोडंसं तहान लाडु-भूकलाडू पोटात ढकलूनच पुढे जावूयात. पिशव्या खुलल्या. या अतल्याने तीनच केळी -तीनच सफरचंद आणले होते. म्हणे "स्यांडी ,तु येणार नव्हतास ना ? आमच्याबरोबर !" जाऊ दे. आता काय बोलायचं ? पैकी तिन्ही केळी मनोरेच्या कार्ट्यानी अधाशासारखी काल रात्री स्टेशनलाच संपवलेली. पण अख्खं सफरचंद मी एकट्याने बळकावल्यामुळे तिघांमध्ये उरलेल्या दोन साठी भांडण. चालु देत. आपल्याला काय त्याचं ? मी आपला खात बसलो. धबधब्याचे नामकरण झालं ," Apple कॉर्नर". 

© Sandip Wadaskar
 



खुप वेळ झाला. चालत होतो,चढत होतो. मळलेली वाट सापडेना. शिडीची खिंड तर दिसत होती. कुठली तरी ढोरवाट पकडुन पुढे जात होतो अणि अचानक ती पण बंद झाली. आणि नेहमीप्रमाणे वाट चुकण्याची परंपरा राखत मी गँग ला चुकवल. उजव्या बाजुचं टेकाड चढ़ायचं ठरवलं. वर गेल्यावर कुठेतरी वाट दिसेल या आशेनी चढायला सुरुवात केली. त्यात या रानटी डासांनी वैताग आणला होता. जरा कुठे थांबलो की अंगावर मच्छरांचा धुमाकुळ. "पण स्यांडीचा चावा घेताना मच्छरांचेच दात तुटत असतील, नाही ?",इति अतुल. दुसरं कोण ? परत हशा! च्या मारी या अतल्याच्या. चांगली छातीवर येणारी चढण करून आम्ही थोड्याश्या उंचीवर आलो,तेवढ्यात तांबड्या रंगाची चिंचोली वाट दृष्टीस पडली. जीव भांड्यात पडला. वरून दोघे जण येताना दिसले. आयला! एवढी चांगली मळलेली वाट सोडून इकडे कुठे भटकलो? अजून अर्धा तास लागंल,गावकरी. मघापासून पाऊस पण दडी मारून बसला होता. तहान लागली होती. भर पावसाळ्यात घामाने निथळत आणि डासांना शिव्या घालत पहिली शिडी गाठली. येथुन मोरबे धरण, इरशाळगडचा सुळका, धुक्यात हरवलेला प्रबळगडाचा माथा,त्याच्या पोटात असलेले असंख्य धबधबे आणि सभोवताल हिरवीगार किर्र झाडी,दृश्याने थकवाच नाहीसा झाला आणि कुठुन एखाद्या रानपाखराचे मंजुळ गीत ऐकल्यावर तर एकदम ताजेतवाने वाटत होते. 


© Sandip Wadaskar 

पुढे छोटासा ट्रअवर्स पार करून शिडीच्या पायथ्याशी येउन ठाकलो.आधी पाण्याची तहान भागवली. माथ्यावरचे पाणी कातळावरून खाली कोसळत होते. याच कातळामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे खिंडार पडून ही नाळ तयार झाली असेल कदाचित. शिडी ही लाकडी होती. पहिली शिडी लागली ती लोखंडाची होती. लाकडाच्या शिडीवरून वर जायचे म्हणजे मनात थोडी भीतीची लहर उमटलीच. एकतर पाण्यामुळे शिडी कुजुन तुटण्याची शक्यता दाट. घट्ट असल्याची खात्री केली आणि एक एक करुन चढायला सुरुवात केली. शिडी संपेपर्यंत काही नाही वाटलं, मात्र शेवटची पायरी चढताना नाका तोंडात पाणी जात होतं. वारं आणि वरून येणारा पाण्याचा प्रवाह यामुळे थोबाडात मारल्यासारखं पाणी लागत होतं. आणि खरं थ्रिल येथुन सुरु झालं,कारण समोरचं दृष्य पाहिल्यावर तर एकदम हरिश्चंद्रगड-नळीच्या वाटेची आठवण आली. मागे वळून पाहिलं तर direct शिफ्ट-डिलीट. अतुल-इंद्रा पुढ्यात आणि सागर सर्वात शेवटी. पावसाचे पाणी वाहत खाली कोसळत होतं ,नशीब शेवाळ जास्त वाढले नव्हते. या नाळेने चढुन तर जाऊ,मात्र उतरतांना काळजाचे ठोके वाढले नाही तर शप्पथ! माझ्या शूज वरचा विश्वास गेल्यासारखा सागरला पाय धरायला सांगत होतो. या कार्ट्याचा तिथे पण डायलॉग "माझा पाय धरायला ,मी कुणाला सांगु ?". वीस मिनिटात हा भयंकर रॉक पैच पार करून आम्ही माथा गाठला. पाच मिनिटाकरिता सगळ्यांचा इंद्रा(?) झाला होता .हा हा ! 

माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या  कचऱ्याचा ढीग. तेच आपलं अपेक्षित असलेलं वातावरण. शार्लोट लेक जवळ तुफान गर्दी. तिथे अजुन आपली गर्दी न करता सरळ स्टेशन जवळ एका मावशीबायची चहाची टपरी गाठली आणि मिसळ-वडापाव ची फर्माईश देत गप्पा मारत बसलो. उदरमभरणं करून परतीची वाट धरली ती प्रिय सह्याद्रीचा निरोप घेऊन ! इति संपूर्ण अजून एक अविस्मरणीय भटकंती !

धन्यवाद !

2 comments:

  1. dhabdhaba.....kasla dhaba dhaba vahtoy,.......... pandhara shubhra........lucky guyss........khupch masttttt ahet pics....

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences