कलावंतीण-प्रबळ-----पहाट नववर्षाची...सह्याद्रीच्या कुशीत 1 of 2

गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीने बऱ्यापैकी जोर धरायला सुरुवात झाली होती .पुण्यातल्या थंडीचा आतापर्यंतचा निच्चांक आणि ३१ डिसेंबर ची चाहूल लागलेली. वातावरण एकंदरीत,आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये "चील्ल्ड "? असे काहीतरी. दरवर्षी प्रमाणे मित्र परिवाराचे नवीन वर्षाचे स्वागत कसे करायचे यांचे प्लांनिंग चाललेले आणि आम्ही भटके कंपनी मात्र सरत्या वर्षाची शेवटची रात्र कुठल्या गडावर घालवायची याचा विचार करत होतो.

शेवटी ठिकाण ठरलं .कलावंतीण -प्रबळ .एक तारखेची बऱ्याच जणांना सुट्टी होती आणि ज्यांना सुट्टी नव्हती त्यांनी दांडी मारायचे ठरवले. तसं पाहिलं तर आम्हाला भटकायला जायला असं गंभीर कारण लागतं असं नाही. आमचा संबंध सुट्टीशी. तेव्हा कुणाची जयंती असो वा कुणाचं काय .फरक पडत नाही. बोंबलत फिरायला कधीही तयार असतो.

अशाप्रकारे आमची भटके कंपनी अर्थात केसागर,प्रसाद ,वासू ,इंद्रा,निखिल तयार झाले .वेळेवर काहीतरी काम निघाल्यामुळे प्रसन्नला यायला जमले नाही आणि ऋषी ला सुट्टी नाही मिळाली. तसंही ह्या ऋषीचं नेहमी काहीना काही असतच.

मी आणि इंद्रा निखिल ची वाट बघत शिवाजीनगरला वेळ घालवत होतो. वासू पुणे रेल्वे स्टेशन वरून लोकल सुटण्याची वाट पाहत होता. थोड्या वेळाने निखिल आला आणि खास आपल्या वऱ्हाडी मिश्रित पुणेरी शैलीत त्याने वाक्य फेकलं,"कुठे जायचं बे आपल्याला ? मी तसाच आलो !" या माणसाला बऱ्याच वेळा माहित नसतं की ,आपण कुठे चाललोय ? पण पठ्ठ्या चालायला एकदम राकट. ४०-५० किमी तर हा हुं किंवा चु न करता असाच चालू शकतो. चालण्याची क्षमता संपली की काही बोलत नाही ,फक्त चालत राहतो. आणि जेव्हा बोलतो तेव्हा सगळे हसतात. हो की नाही रे प्रसन्न ? असु दे . 

काही वेळाने वासू पुणे स्टेशन वरून निघाला.लोकल शिवाजीनगरला पोहोचली. आम्ही चढलो.बघतो तर या वासूने पाण्याची बाटली सुद्धा नव्हती आणली सोबत .bag तर दूरच. तसाच ऑफिस मधून सुटला होता वळू सारखा.शेपटी (हात) हलवत.नशीब रस्त्याच्या बाजूला दिसली असेल म्हणून टोर्च घेतला होता.पुढे प्रसाद तळेगावला चढला आणि केसागर मुंबईवरून निघाला होता.सगळेजण कर्जत ला भेटायचं ठरलं होतं. साढेअकराच्या दरम्यान आम्ही लोणावळ्याला पोहोचलो.


लोणावळा स्टेशन तसं गर्दीचं ठिकाण. पण गर्दी नव्हती. कदाचित वर्षअखेरचा दिवस असल्यामुळे गर्दी बहुतेक आपापल्या परीने नवीन वर्षाचे स्वागत करायास व्यस्त असली पाहिजे.मी आणि इंद्रा कर्जतचे तिकीट काढायला counter वर गेलो तर "तो" म्हणाला "पुढच्या वर्षी मिळेल"."पुढच्या वर्षी ??????", मी. 

"हो. म्हणजे रात्री बारा नंतर" तो म्हणाला. कारण गाडी पाऊण वाजता होती ,पुढच्या वर्षी. आम्ही आमच्या गप्पांचा ओघ सुरु केला. रेल्वे घड्याळामध्ये बारा वाजायला अजून पाच मिनिटे बाकी होती,पण बाहेर फटाक्यांची आतिषबाजी व्हायला सुरुवात झाली.  आणि थोड्याच वेळात भारतवर्षांनी इंग्रजी नवीन वर्षात म्हणजे २0१३  मध्ये प्रवेश केला. सगळ्यांनी एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मी आणि इंद्रानी तिकीट काढून आणलं आणि थोडसं सेलिब्रेशन म्हणून स्टेशन बाहेर जाऊन आईस्क्रीम वर यथेच्छ ताव मारला.

परत स्टेशन वर येउन चहाट्या मारत गाडीची वाट बघत बसलो. पुढच्या ट्रेकचा विषय निघाला. पाच किल्ले दोन दिवसात. बहुतेक इंद्राला याची कल्पना नसावी . तो पुटपुटला ,"येडे आहात का रे तुम्ही ?" मी त्याच्याकडे बघत म्हटलं ,"तुम्ही ?????" आवरतं घेत इंद्रा म्हटला,"  म्हणजे, आपण ! ". सगळे हसायला लागले.

थोड्याच वेळात गाडी आली. रात्रीचे साधारण एक वाजले असतील. आमचा प्रवास कर्जतच्या दिशेनं चालू झाला. गाडीने खंडाळा स्टेशन सोडलं आणि आम्हाला वेध लागले ते बोर घाटातील निसर्ग सौंदर्याचे. अर्थात रात्रीची वेळ असल्यामुळे ते पूर्णपणे अनुभवने शक्य नव्हते पण सह्याद्रीच्या शांत आणि निवांत आसमंतातून गुपचूप जणू काही दबक्या पावलांनी वाट काढीत असलेल्या गाडीतून प्रवास करण्याचा आनंद आम्ही घेऊ शकत होतो. 

बोर घाट. कोंकणातून देशाकडे आणि देशावरून कोंकणात व्यापाराचा अजून एक पुरातन धोपट मार्ग. हा घाट म्हणजे जणू भटक्यानचा पावसाळ्यातला स्वर्ग. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पहायची असेल तर पावसाळ्यात पुणे-मुंबई प्रवास करणे हे अविस्मरणीय.  अफलातून छोटे मोठे धबधबे, सुंदर पाण्याचे तळे आणि दोन्ही बाजूला असलेलं घनदाट जंगल या सगळ्यांनी नटलेला  सह्याद्री मधून जाणारा आणि पुणे मार्गे दक्षिण भारत मुंबईला जोडणारया बोर घाटातून प्रवास करणे हा एक सुखद अनुभव ठरतो.  रेलमार्गाने हा घाट खंडाळा(देशावर) व  कर्जत(कोंकणात) या गावांना  आणि घाट रस्त्याने खंडाळा(देशावर) व खोपोली(कोंकणात) या गावांना जोडतो.गाडी जाण्या इतपत मार्ग हा एका  शिंग्रोबा नावाच्या  स्थानिक धनगराच्या साह्याने ब्रिटिशांनी बांधला.

आम्ही कर्जत ला पोहोचलो. साधारण २ वाजले असतील. स्टेशन वर केसागर ची वाट बघत बसलो. लगेच ५-१० मिनिटात केसागर येउन पोहोचला,सगळे सांगाती जमले. कर्जत चं बस stand गाठलं आणि थोडं विसावलो. कर्जतच हे बस स्थानक सुद्धा आम्हाला आता नवीन राहिलं नाहीये,नेहमीचा कट्टाच होऊन बसलाय असं म्हणायला हरकत नाही. रात्रीचे सव्वादोन-अडीच झाले असावेत. 


 प्रसादने घरून आणलेल्या वडापावची भाजी आणि पोळ्यांवर ताव मारून झोपी गेलो. सकाळी पाचला जाग आली तेव्हा एक कुटुंब पहिल्या बसची वाट बघत बसलं होतं. आवरावर करून नाश्ता पाणी आटोपले आणि सहा वाजताच्या बस नी शेडुंग ला जायला निघालो. थंडीने कुडकुडत शेडुंग फाट्याला उतरलो. 





सकाळचे पावणे सात -सात झाले होते. पण अजूनही अंधारच होता. आम्हाला अजून ४ -५ किमी अंतर कापायचा होतं. रस्त्यावर कुठे वाहन सापडेना. वाट न बघता पायदळ वारी सुरु केली. जवळपास अर्धा तास चालून झाल्यावर कुठल्यश्या एका गावात पोहोचलो . काय बरं गावाचं नाव ? हो सांगडे . सांगडे गावात पोहोचलो. गावातल्या एका सुंदरश्या बस स्थानकाजवळ येउन थांबलो. बस स्थानक एखाद्या चित्रातल्या सारखं भासत होतं .आणि बस थांब्यासमोर रांगोळी वगैरे काढल्या होत्या. कुठलातरी उत्घाटन समारंभ पार पडला असं वाटत होतं. बाकी गाव मस्त होतं शांत निवांत ! गावकर्यांना चौकशी केली असता बस साधारण आठ -सव्वा आठ ला येईल असं कळलं. थोड्याच वेळात शाळकरी मुलं जमा व्हायला लागली आणि बस येण्याची खात्री पटली. 





 
पूर्वेकडे बघतो तर काय सूर्य वर डोके काढायला लागला होता. मस्त दिसत होता लाल ठिपका ! वाह ! जसा जसा वर येत होता ,तसा रंग बदलत होता. कॅमेरा मध्ये बंदिस्त करायला सुरुवात केली. सुर्योदयाची फोटोग्राफी झाल्यानंतर परत बस ची वाट बघत बसलो. बराच वेळ झाला ,बस येईना झाली. थांबायचा कंटाळा यायला लागला. सर्वानुमते चालायला सुरुवात केली. 




अरे हो मी सांगायचंच विसरलो . आम्हाला जायचं होतं ठाकूरवाडी येथे . प्रबळगडाचं पायथ्याचं गाव ,तसं पाहिलं तर प्रबळमाची हे पायथ्याचं  ठिकाण. ठाकूरवाडी वरून जवळपास १३०० फुटावर. वाहनाने ठाकूरवाडी पर्यंत जाता येतं आणि त्यापुढे प्रबळमाची पर्यंत बैलगाडीच्या रस्त्याने चालत जावं लागतं . त्याच वाहनाची म्हणजेच लाल डब्ब्याची वाट पाहत कंटाळुन आम्ही ठाकूरवाडी ची वाट धरली. 

चालताना आम्ही गावातील आजूबाजूचे निरागस निसर्ग सौंदर्य न्याहाळत होतो. १५ - २० मिनिटे चालल्यानंतर मागून ओळखीच्या इंजिनाचा आवाज ऐकू आला. वळून बघितलं तर एस टी चं धूड. पटापट बस मध्ये बसलो आणि १५ मिनिटात ठाकूरवाडीस पोहोचलो.  





प्रबळमाची कडे चालायला सुरुवात केली. ठाकरांच्या गावातून चालताना मजा वाटत होती. थोडे पुढे गेलो तर दहा बारा टुमदार बंगल्यांची वसाहत. बहुदा मुंबईकरांची वीक एंड होम्स. प्रबळमाची ची वाट चढताना आधी भरकटलो खरं ,पण लगेच वाट सापडून मुख्य रस्त्याला लागलो.चालताना उजव्या बाजूला एका डोंगरामध्ये त्याच्या रचनेमुळे नंदी बैल बसल्याच्या भास होत होता. 






सकाळचं कोवळं ऊन झेलत आम्ही भटके चालत होतो. रस्ता बर्यापैकी धोपट आणि रुंद. बहुतेक गाडी मार्ग तयार होण्याच्या मार्गावर ? पहिल्या डोंगर माथ्यावर येउन पोहोचलो. खालचे ठाकूरवाडी गाव आणि सर केलेला गाडी रस्ता न्याहाळीत,कोवळ्या सूर्यकिराणांचा आणि सह्याकड्यांचा लपंडाव यांचा मनमुराद आनंद लुटत होतो. डाव्या बाजूला प्रबळगडाचा उंचच उंच डोंगर लक्ष वेधून घेत होता आणि डोंगराआड सुर्यनारायण हळू हळू वर येत होते. सुर्य जसा जसा वर येतोय तसं वातावरण उष्ण व्हायला लागलं होतं आणि कोंकणात असल्यामुळे वरून दमट. 



पुढे जाऊन एक देउळ लागलं. देउळ नाही म्हणता येणार. एका मोठ्या दगडात गणेशाची आणि हनुमानाची मूर्ती कोरल्या होत्या. नमस्कार करून पुढे निघालो. बुरुजासारखा सारखं काहीतरी दिसलं. तिथे पोहोचलो तर एक पडकी भिंत,हीच ती जी खालून बुरुजासारखी भासत होती. बाजूला वडाचं मोठं झाड आणि झाडाभोवती बांधलेला पार. मस्त दिसत होतं. आणि खालचं दृश्य तर अजूनच भारी! थोडा वेळ थांबून चालत प्रबळमाची वर पोहोचलो. 


थोडं पुढे गेलो आणि कलावंतीण बुरुजाचे प्रथम दर्शन झाले. एक नंबर. आपसूकच मुखातून गौरवोद्गार निघाले. बुरुजावरून कलावंतीण आमचं स्वागत करताहेत असा उगीचच भास झाला. "यावं ,मावळ …. आला $$. कसा आहेसा ? काय तरस नाही ना झाला नवं ? खाली माचीवर थोडसं चार घास खावा आणि यावा मग आमच्या भेटीला बुरुजावर … काय ? 

कलावंतीणीच दर्शन होताच चालण्याचा हुरूप वाढला. उजव्या बाजूला प्रबळ गडाचा माथा आणि दोहोंच्या मध्ये इंग्रजी व्ही आकाराची खिंड. नयनरम्य दृश्य ! माचीवर पोहोचताच ठाकरांच्या वाडीत शिरलो.  



एका घराच्या अंगणात निवांत जाऊन बसलो. अंगणात कोंबडीची छोटी छोटी पिल्लं खेळत होती. घराच्या बाजूला वीटभट्टी होती आणि आजूबाजूला ठाकरांची पोरं खेळण्यात दंग होती. आजोबांनी पाणी आणून दिले. हात पाय धुवून थोडं हुशार झालो. आता भुका पण लागल्या होत्या. आजोबांकडे जेवणाची चौकशी केली असता त्यांनी हाताने इशारा करून त्या घरी जाण्यास सांगितले. 

तेथे जेवणाचं सांगून आम्ही बुरुजावर जाण्याचं ठरवलं. बुरुजावर जाण्यास माची वरून साधारण पाऊण तास लागतो. १५ मिनिटात आम्ही कलावंतीण आणि प्रबळगडामधल्या खिंडीमध्ये पोहोचलो. हीच ती प्रसिद्ध खिंड,ज्याच्यामधून सुर्य अस्ताला जातो माथेरान वरून भास होतो . ज्या सूर्यास्त सोहळ्यासाठी पर्यटक माथेरानच्या सनसेट पोइंत वर गर्दी करतात . या खिंडीतून खाली पूर्वेकडे पायवाट जाते ,ती सरळ माथेरान ला. एका बाजूला कलावंतीण आणि दुसऱ्या बाजूला प्रबल गडाचा माथा. 




खिंडीमधून बुरुजाचा अंदाज घेतला. आमच्यापुढे तीन ट्रेकर गप्पा मारत बसले होते . कदाचित बुरुज उतरून झाला असेल. बुरुजाची उंची तेवढी वाटत नव्हती. माध्यान्हीचा सुर्य डोईवर तळपत होता. आम्ही चढायला सुरुवात केली. घसारया वरून थोडं चढत गेलं की दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. कुठे दीड फुटाच्या ,कुठे दोन ,कुठे अडीच फुट उंचीच्या. पायऱ्यांवरून चढताना मजा वाटत होती आणि भाजत पण होतं . बाकी दगडांमध्ये पायऱ्या बनवणारयांची कमाल ! 

दीड फुट -दोन फुट करत करत आम्ही बुरुजावर चढलो. बुरुजावर चढल्यावर एक मोठा दगड दिसतो . ज्याला ट्रेकिंग च्या भाषेत रॉक patch असे म्हणतात . थोडी कसरत करून आम्ही बुरुजाच्या सर्वोच्च शिखरावर येउन पोहोचलो. 






कलावंतीण दुर्ग. पुणे-मुंबई हमरस्त्यावरून  दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची  जाणीव करून देणारा बुरुज. जिच्या साठी हा बांधला तिच्या नावावरूनच या बुरुजाचे नाव पडले. शिखरावरून आपल्याला दक्षिणेकडे प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख दृष्टीस पडतो.अर्थात हे सगळं पाहायला वातावरण स्पष्ट असायला हवं.  प्रबळमाचीवारचे ठाकर लोक होळीला येथे त्यांच्या पारंपारिक पद्धतीने शिमगा साजरा करतात. 


थोडा वेळ फोटो सेशन आणि हातात भगवा घेऊन जल्लोष केला आणि खिंडीमध्ये उतरून छोटीसी पोटपूजा केली. प्रबळमाची कडे चालायला लागलो. 

हा ब्लॉग वाचल्याबद्दल मनापासून आभार,पुढचा भाग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
 
  

Keep trekking, discovering Sahyadri and yourself with WILD TREK ADVENTURE CLUB,PUNE
  







12 comments:

  1. mast...total description sandy...

    ReplyDelete
  2. Sandy Gr8 yar...agadi jashla tase lihales tu...

    ReplyDelete
  3. Khup sundar varnan..maja aali rao :)

    ReplyDelete
  4. उत्तम वर्णन ..!! काहीच मिर्च मसाला किंवा अतिशयोक्ती , अलंकारीक वर्णने नसल्यामुळे मनाला भावला. भटकंती चालू राहूदे .

    शुभास्ते पंथांना सन्तु !!

    - Manoj

    ReplyDelete
  5. खूप छान वर्णन केलंय तुम्ही प्रत्यक्ष तिकडे गेल्या सारखं अनुभव आला
    असेंच भटकत जा नवं नवीन ठिकाणं शोधत राहा आणि तुमचे अनुभव शेअर करत जा
    खूप शुभेच्छा

    ReplyDelete

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences