कोंकण प्रवास 2010 -गणपती पुळे,गुहाघर

Previous part
गोष्ट एका झुरळाची - भाग 1
Current part
गोष्ट एका झुरळाची - भाग 2



आनंदीचा वाढदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी  आम्ही हेद्वीवरून गणपती पुळेला जायला निघालो .वाव!!! कोंकणातले नागमोडी रस्ते,सोबतीला घरच्यां सोबतच्या गप्पा,सीडी प्लयेर मध्ये सुरु असलेली जुनी हिंदी- मराठी गाणी.वाह कोंकणातल्या सहलीचा आनंद काही निराळाच. 







पण आमच्या जिजाजींच्या कानात झुरळ गेल्यामुळे थोडसं आनंदावर विरजन पडल्यासारखंच  झालं होतं. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टर शोधायचं चाललं होतं.पण डॉक्टर कुठे सापडतोय? तसच आम्ही पुढे निघालो. हेदवी ते गणपती पुळे हे अंतर साधारण 77 किमी  पडतं .पण आम्ही ते अंतर ,जयगड़ खाड़ी वर आता 7-8 वर्षापूर्वी एक नवीन  ब्रिज झालाय ,त्या ब्रिज वरून खुप कमी वेळात कापलं . ब्रिज वर थोडा वेळ थांबुन फोटोसेशन केलं.







मस्तच!!!! खाड़ी च विहंगम दृश्य दिसत होतं .थोड्याच वेळात आम्ही गणपती पुळे ला पोहोचलो .दुरूनच गणपती पुळेचा समुद्र किनारा खुणावतोय असा वाटत होतं.लय भारी! कधी कधी असं वाटतं ,सगळं सोडुन आयुष्यभर भटकत राहावं .पण काय करणार रोजची भाकर कोण कमावणार ?? 




आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आजूबाजूला भरपूर दुकानं ,हॉटेल्स,मोठमोठ्या कार पार्किंग सोबतीला लोकांचा किलकिलाट . सगळं व्यावसायीकरण झालंय .जाऊ देत .आपणच गर्दी करणार आणि आपणच गर्दी बद्दल बोलणारं यात काही अर्थ नाही .तर सांगत काय होतो ?







हा ! गणपतीपुळे मंदिर. हे मंदिर कोंकणातल्या एका सुंदर ,अतिरम्य ,स्वच्छ आणि तितकाच धोकादायक अशा समुद्रकिनारयावर वसलेलं आणि नवसाला पावणारा गणपती ,यामुळं प्रसिद्ध आहे .मंदिर आहे चारशे वर्षापूर्वीचे आणि कोंकणातल्याच पारंपारिक लाल जांबा दगडापासून बनवलेलं.आणि गणपतीची मूर्ती स्वयंभू बरं का ! समुद्र किनाऱ्या वरच्या पांढऱ्या शुभ्र वाळूपासून बनलेली .गणपती बाप्पा चा दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. गुहाघरला ला रात्रीचं थांबायचं ठरलं .तसा पुढचा प्रवास सुरु झाला .





प्रवासात सगळे जांबा दगडाबद्दल बोलत असतानाच निनाद दादाला रस्त्याच्या बाजूला थोडं आत त्या दगडांची खाण दिसली.दोन्ही गाड्या त्या दिशेने वळवल्या.हा लाल खडक फक्तं कोंकण पट्ट्यात  आढळतो. त्या खाणीच्या बाजूलाच ,दगडांपासून विटा पाडण्याचं यंत्र ठेवलं होतं.जांबा बद्दल थोडं ज्ञान पदरात पाडून आणि फोटो काढून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो . झुरळ अजूनही कानातच होतं.






संध्याकाळ पर्यंत आम्ही गुहागर ला पोहोचलो.भूक आणि तहान सगळ्यांना सपाटून  लागली होती. पण तेवढ्यात समोर एक सरकारी हॉस्पिटल दिसल्यामुळे ,टपरीवरच्या पाण्यावर भागवून आधी झुरळाचा निकाल  लावायच्या उद्देशाने सगळेजण बाहेर थांबले. निनाद दादा आणि राहुल दादा हॉटेल शोधायला गेलेत. आदित्य आणि मी जीजाजींसोबत हॉस्पिटल मध्ये शिरलो.

पहिली गोष्टं म्हणजे हॉस्पिटल मधला डॉक्टर हा डॉक्टर अजिबात वाटत नव्हता ,पण पर्याय नव्हता. त्याची कानातून झुरळ बाहेर काढण्याची कसरत सुरु झाली. तो काहीतरी सिरींज ने कानात पाणी टाकत होता आणि डिसेक्शन कीट च्या साह्याने झुरळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. पण फक्तं प्रयत्न चालले होते,झुरळ काही बाहेर यायचं नाव नव्हतं काढत. तेवढ्यात बाहेर एक पोस्टमार्तम ची केस आली (कुणीतरी म्हाताऱ्यानी आत्महत्या केली होती) आणि ते सगळे डॉक्टर ची वाट बघत होते. पण डॉक्टर महाशय एकदम जोश मध्ये .म्हणतात कसे "आधी झुरळाचा पोस्टमार्तम करतो, नंतर म्हाताऱ्याच्या डेड बॉडी कडे बघतो ".त्याही तणावाच्या प्रसंगी सगळ्यांच्या   चेहऱ्यावर थोडे थोडे स्मित हास्य का? काय! ते म्हणतात ना ? ते  पसरले. आणि तेवढ्यात त्या गडबडीत सिरींज कानाच्या नाजूक जागेवर टोचल्या गेली आणि रक्तं यायला लागलं .मग काय? सगळे टेन्शन मध्ये. डॉक्टर चे पण धाबे दणाणले. क्षणाचाही विलंब न करता त्यानी चिट्ठीमधे एका स्पेशालिष्ट डॉक्टर चं नाव आणि स्वतःचा रेफरन्स देऊन  चिपळूण किंवा दापोलीला जायला सांगितलं. पण रात्रीचा उशीर झाल्यामुळे सकाळी जायचं ठरलं .

तेवढ्यात राहुल आणि निनाद दादा हॉटेल शोधून आले. त्यांनी एक घरघुती रेसोर्ट बुक केला होता. सगळे रेसोर्ट कडे निघाले. रात्रीचे साढे दहा  अकरा झाले असतील.जाताना आजूबाजूला खूप गर्दी होती. रेसोर्ट जवळ पोहोचलो तर कळाले की  मघाशी हॉस्पिटल मध्ये जी पोस्टमार्तम ची केस आली होती तीच आत्महत्या म्हाताऱ्यानी या रेसोर्टच्या बाजूच्या घरात केली होती. काय रे देवा !!!!!!!

गाड्यांमधून सगळं समान बाहेर काढून रूम मध्ये ठेवलं आणि जवळच्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो. जेवण करून परतलो आणि झोपायच्या तयारीला लागलो.ते चालू असताना भिंतीच्या एका छिद्रातून  छोटासा विंचू बाहेर आला.सगळे चाटच पडले .काहीच कळायला मार्ग नाही ,चाललंय काय?. कानात झुरळ गेल्यापासून सोबत कानात घालायला कापूस विकत घेतला होता. त्याचा एवढ्या लवकर उपयोग होईल असा वाटलं नव्हतं.  
पण काय करणार, सगळ्यांनी कानात कापूस घालून सगळे झोपी गेले.




सकाळी उठून आदित्य आणि मी बाकीच्यांची तयारी होईपर्यंत एक फेरफटका म्हणून गावात फिरायला गेलो. फिरता फिरता एक रस्ता वजा गल्लीमध्ये शिरलो ,तर पुढे गुहागरचा सुंदर समुद्रकिनारा दृष्टीस पडला. मी आपला घाई घाई ने किनाऱ्याकडे निघालो होतो ,तेवढ्यात आदित्यनी हाक मारली आणि बघतो तर काय! आदित्य स्मशान घाटाकडे हात दाखवुन ,खूप मागे उभा होता. लगेच तेथून आम्ही धुम ठोकली,थेट रेसोर्ट कडे. परत आल्यावर असाच एक मनात विचार आला "च्यायला त्या झुरळाचं भूत तर नाहीये ना आपल्या मागावर ?". 

सामनांची आवरा आवर करून आम्ही दापोलीच्या दिशेने निघालो. अजुनही झुरळ कनातच होतं .

To be continued............
Keep watching space for next part of  story  कोंकण प्रवास 2010- आन्जर्ले ,कड्यावरचा गणपती  
गोष्ट एका झुरळाची - भाग 3


No comments:

Post a Comment

Thanks for putting comments. Keep watching space for new experiences